12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य

| Updated on: Dec 28, 2021 | 1:33 PM

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. मात्र, आता या निलंबनावरून अजित पवार हे निलंबन मागे घेण्याच्या म्हणजेच भाजपच्या बाजूने असल्याचे दिसत आहेत.

12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य
अजित पवार, उपमुख्यमंत्री.
Follow us on

मुंबईः कुणी जर चुकलं, तर त्याला 4 तास बाहेर ठेवा. 4 तास कमी वाटत असतील, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम 12-12 महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना केले. यापूर्वी भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झाले आहे. हे निलंबन मागे घ्यावे, अशी भाजपची मागणी आहे. या अनुषंगाने अजित पवारांनी सभागृहात आज भाजपच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे सभागृहातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नेमके प्रकरण काय ?

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील हौदात उतरुन सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. या प्रकारानंतर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, आता या निलंबनावरून अजित पवार हे निलंबन मागे घेण्याच्या म्हणजेच भाजपच्या बाजूने असल्याचे दिसत आहेत.

अजितदादा काय म्हणाले?

आमदार निलंबनावर अजित पवार म्हणाले की, कधी कधी काही प्रसंग घडतात. ते तेवढ्या पुरते घ्यायचे असतात. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढायचा असतो. आणि वेळ मारून न्यायची असते. त्याबद्दलही दुमत नाही. जोपर्यंत कुणी जर चुकीचं असेल, तुम्ही नियम करत नाही, तोपर्यंत चुकायचं थांबणार नाही. माझी विनंती आहे की, कुणी जर चुकलं तर त्याला नियम करा आणि चार तास बाहेर ठेवा. तरी त्याला त्याची चूक कळेल. चार तास कमी वाटत असेल तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम बारा बारा महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे म्हणत त्यांनी याप्रश्नी आपण भाजपसोबत असल्याचेच दाखवून दिले.

आमदारांची घेतली शाळा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणातून आमदारांची अक्षरशः शाळा घेतली. ते म्हणाले, काही आमदारांनी तर नमस्कार करणं सोडून दिलंय. त्यांना तारतम्य राहिलं नाही. सगळंच आपल्याला समजतंय असं यांना वाटत आहे. आम्हाला आमदार होऊन समजत नाही. यांना कधी समजायला लागलं. याचा तरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन करत त्यांनी या आमदारांचे कान टोचले. अजित दादांचा असा पवित्रा पाहता, अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले.

इतर बातम्याः

सगळा तामझाम करुन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक करण्याची तयारी, मग नेमकं ट्विस्ट कुठून आलं?; शरद पवारांचा रोल काय?

Maharashtra Assembly: कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं आपण प्रतिनिधीत्व करत नाही याची जाणीव ठेवा; अजित पवारांनी आमदारांचे कान टोचले