
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून ते बारामतीला सभेसाठी जात होते. मात्र बारामतीच्या धावपट्टीजवळ आल्यावर लो व्हिजीबिलीटीमुळे विमान धाडकन खाली कोसळलं आणि मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला. क्षणात ते आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं आणि आणखी3-4 स्फोट झाले. बुधवारी सकाळी 8.45च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलवट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली या पाचही जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अख्ख्या बारामतीवर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली असू पवार कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मनसे नेते राज ठाकरे, नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते यांसह अजित दादांचे कुटुंबिय, त्यांचे चाहते, बारामतीकर यांच्या उपस्थिती अजित दादांना शासकीय इतमामात अंतिम निरोप दिला जाणार आहेत. त्यापूर्वी काटेवाड येथील निवासस्थानी अजित पवांरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून तिथेही मोठा जनसागर उसळला आहे.
बुधवारी सकाळी 8च्या सुमारास मुंबईहून अजित पवारांच्या विमानाने उड्डाण केलं आणि 8.45 च्या सुमारासा बारामतीजवळ हा अपघात घडला. अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची अधिकृत माहिती आधी समोर आली नव्हती, मात्र काहीच वेळात अपघाताचे वृत्त समोर आलं आणि खळबळ माजली. मात्र अजित दादांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात आधी कोणाला समजली, याबाबत अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना अजित दादांच्या अपघाताबद्दल सर्वात आधी समजलं होतं. खुद्द राजेश टोपे यांनीच याबाबत सर्व सविस्त सांगितलं.
काय म्हणाले राजेश टोपे ?
अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालाय ही माहिती आधी कोणाकडेही नव्हती, मीडियालाही समजलं नव्हतं. मला सर्वात आधी याबद्दल समजलं होतं. आमच्या जिल्ह्यातील एक मुलगा बारामती विमानतळावर स्टोअर रुममध्ये कामाला आहे. काल सकाळी त्याने मला फोन केला आणि सांगितलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आहे. त्यांच्या विमानाचं फक्त शेवटचं टोक दिसतंय, बाकी संपूर्ण विमान जळून खाक झालंय, असं त्याने मला सांगितलं, असं राजेश टोपे म्हणाले. अजित पवार यांच्या जाण्याने भाऊ गेल्याची भावना आहे, असं म्हणताना टोपे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते अतिशय भावूक झाले होते.
3 दिवसांचा राजकीय दुखवटा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला. 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद असतील. तर शाळांना केवळ 28 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. 29 व 30 तारखेला शाळा नेहमीप्रमाणे सुरू असतील अशी माहिती समोर आली आहे. इतर शैक्षणिक संस्थांचे कामकाजही नियमित सुरू राहील.त्यांना सुट्टी देण्याचे कोणतेही शासकीय आदेश देण्यात आलेले नाहीत.