गुलाबराव पाटलांनी मस्तीची भाषा करु नये, सभेत घुसला तर परत जाणार नाही, जळगावच्या सभेवरून कुणी दिला इशारा?

| Updated on: Apr 22, 2023 | 5:17 PM

गुलाबराव पाटील यांनाही आता ठाकरे गटाकडून इशारा देण्यात आलाय. गुलाबराव पाटलांनी मस्तीची भाषा करू नये. सभेत घुसलात तर परत जाणार नाही, असं वक्तव्य कऱण्यात आलंय.

गुलाबराव पाटलांनी मस्तीची भाषा करु नये, सभेत घुसला तर परत जाणार नाही, जळगावच्या सभेवरून कुणी दिला इशारा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या जळगावातील सभेवरून चांगलंच राजकारण तापलंय. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) या सभेच्या तयारीसाठी जळगावात पोहोचले आहेत. तर सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात एक शब्द जरी काढला तरी सभेत घुसेन, सभा उलथवून देईन, असा इशारा शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय. तर गुलाबराव पाटील यांनाही आता ठाकरे गटाकडून इशारा देण्यात आलाय. गुलाबराव पाटलांनी मस्तीची भाषा करू नये. सभेत घुसलात तर परत जाणार नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.

काय म्हणाले दानवे?

उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून विरोध करू, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिलाय. ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी मस्तीची भाषा करू नये..सभेत घुसलात तर परत जाणार नाही…ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी आहेत. आम्हाला त्यांच्या सभेत घुसता येत नाही का..त्यामुळे दादागिरीची भाषा करू नये, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांच्या सभेचे बॅनर्स काढण्याचे प्रकारही जळगावात सुरु आहेत. यावरून अंबादास दानवे म्हणाले, ‘परवानगी घेऊन लावलेले बॅनर्स असतील काढता कामा नये. परवानगी शिवाय लावले असतील तर ठीक मी अधिक माहिती घेतो…

जळगावात मनसेही आक्रमक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खारघर येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राजकारण होऊ नये असे मत व्यक्त केलं होतं, त्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे जळगावातील मनसैनिकांनी संजय राऊत यांचा निषेध नोंदवला आहे. पाचोरा शहरातील मनसैनिकांनी शनिवारी एकत्र येऊन बैठक घेतली. या बैठकीत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संजय राऊत यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

हाच खरा ठाकरी बाणा…

अजित पवार यांच्या भाजपशी सलगी करण्याच्या चर्चांवरून अंबादास दानवेंनी मोठं वक्तव्य केलंय. शिवसेनेतूनही
जे जातील त्याला जाऊ द्या पुन्हा शिवसेना मोठी करू..अशा लोकांचे मन तिकडे आणि शरीर इकडे होते.. त्याचमुळे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना न अडवण्याची भूमिका घेतली हाच खरा ठाकरी बाणा आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलंय.

अजित पवार मुख्यमंत्री?

राज्याचे भावी मुख्यमंत्री अजित पवार या आशयाचे बॅनर्स लागल्याने पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावरून अंबादास दानवे म्हणाले, अजित पवार यांचे पुण्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पोस्टर लागले असतील तर चूक काय कुणालाही मुख्यमंत्री होता येऊ शकते ही कार्यकर्त्यांच्या मनातली भावना असते..