Ambernath News : प्रेमसंबंधाच्या संशयातून मारहाण, तरुणाचा मृत्यू; अंबरनाथमध्ये संतापाचा स्फोट, तोडफोड, घेराव आणि ..
अंबरनाथमध्ये ओम खोरेच्या मृत्यूने तीव्र पडसाद उमटले आहेत. पुतणीशी प्रेमसंबंधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत ओमचा जीव गेला. संतप्त पालेगाव ग्रामस्थांनी भाजप नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची व हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यात आणण्याचा इशारा दिला आहे.

अंबरनाथमध्ये पुतणीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेला तरुण ओम खोरे याचा मृत्यू झाल्यानंतर तीव्र आणि संतप्त पडसाद उमटले आहेत. पालेगाव परिसरात भाजपा नगरसेविका पुनम पाटील यांच्या कार्यालयाची जमावाने तोडफोड केली असून यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यालाही घेराव घालत सर्व आरोपींना अटक न केल्यास ओम खोरेचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्याचा इशारा पालेगावच्या ग्रामस्थांनी दिला.
ओम खोरे या तरूणाला २३ जून रोजी संदीप गवळी, रवी परमार, नयन मढवी, सचिन पाटील आणि राज देसेकर यांनी जीवघेणी मारहाण केली होती. यानंतर केईएम रुग्णालयात उपचार घेत असताना १ जुलै रोजी सायंकाळी ओम खोरेचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच संतप्त जमावाने पालेगाव परिसरातील भाजपा नगरसेविका पूनम पाटील यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ओम याला मारहाण करणारे आरोपी पाटील यांच्याशी संबंधित असल्याचा जमावाचा आरोप होता. या घटनेनंतर भाजपा गटनेते अभिजीत करंजुले, नगरसेवक विश्वजीत करंजुले, पवन वाळेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी नगरसेविका पूनम पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली असून या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
आरोपींना अटक करा, नाहीतर मृतदेह पोलिस स्टेशनला आणू
यानंतर जमावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांना आम्ही सात आरोपींची नावं दिली होती. मात्र त्यापैकी ओमचा मृत्यू होण्यापूर्वी फक्त दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि उर्वरित तीन आरोपींना ओमचा मृत्यू झाल्यानंतर अटक करण्यात आली. यातील उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा उद्या ओमचा मृतदेह रुग्णालयातून थेट पोलीस ठाण्यात आणू, असा इशारा यावेळी पालेगावच्या ग्रामस्थांनी दिला. यावेळी विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीसीपी सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे यांच्यासह उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.
दरम्यान, या सगळ्यानंतर डीसीपी सचिन गोरे यांनी या प्रकरणात आत्तापर्यंत पाच आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच आणखी संशयित आरोपींनाही लवकरात लवकर अटक केली जाईल, अशी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली. या सगळ्या प्रकरणात ग्रामस्थांनी मागणी केलेल्या संशयितांची नावं गुन्ह्यात आरोपी म्हणून समाविष्ट केली जातात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.