गृहमंत्री नात्याने नाही, तर आंदोलक म्हणून आलोय; मुंबईत अमित शहा असे का म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज एशियाटिक सोसायटीका भेट दिली. त्यावेळी त्यांनी विविध बाबींवर भाष्य केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईच्या फोर्टमधील दी एशियाटिक सोयायटीला अमित शहा यांनी भेट दिली. त्यानंतर एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधला. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. एशियाटिक सोसायटीच्या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. तसेच भारतीय ज्ञान परंपरेवरही भाष्य केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच मी गृहमंत्री नात्याने नव्हे, तर आंदोलक म्हणून आल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘मी एशियाटीक सोसायटीच्या इमारतीत प्रवेश करत होतो. त्यावेळी विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, या इमारतीत पहिल्यांदा कोणीतरी देशाचे गृहमंत्री येत आहे. मी गृहमंत्री आहे. परंतु गृहमंत्र्यांच्या नात्याने आलो नाही. भारतीय ज्ञान परंपरा 1000 वर्षांपर्यंत पुढे नेण्यासाठी आंदोलक म्हणून आलो आहे. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कमिटीतील अनेक सदस्यांना ओळखतो. मला निमंत्रण द्यायला आले होते, त्यावेळी ओळख करून दिली. आगामी काळात एशियाटिक सोसायटी ही भारतीय ज्ञान परंपरेचं वाहक बनेल. जो देश इतिहास, संस्कार, भाषा,परंपरेची रक्षा करत नाही, तो कितीही शक्तिशाली असेल, त्याला नाहीसे होण्यासाठी उशीर लागत नाही. जो राष्ट्र स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा आणि व्याकरणाचं संरक्षण करतो, त्या राष्ट्राला किती वर्ष गुलाम ठेवलं, तरी त्याला गुलाम बनवता येणार नाही’.
‘अनेकांनी प्रयत्न केले. नालंदाचं ग्रंथालय जाळले, त्यावेळी महिनाभर धूर निघत होता. नालंदा जाळू शकतात, पण लोकांचं ज्ञान जाळू शकत नाही. आज एशियाटिक सोसायटीच्या इतिहासावर भाष्य करणार नाही. हा जुना इतिहास आहे. आपला पराभव होतो, त्यावेळी पुढे जाण्याचा मार्ग शोधतो. जेव्हा विजय मिळवतो, त्यावेळी ज्यांच्यावर विजय मिळवतो, त्यांच्या स्मृती नष्ट न करता त्यांना आपल्या कार्यात जोडण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या ज्ञानाला कोणती विचारधारा बंदिस्त करू शकत नाही. तुमची एखादी विचारधारा असेल, तर तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने बदलू शकता. ज्ञान मुक्त असायला हवं. एशियाटिक सोसायटी कोणी बनवली, कधी बनवली आणि कोणत्या उद्देशासाठी बनवली, याचा विचार करण्यापेक्षा इथे असलेल्या ज्ञान भंडाराचा उपयोग हा भारताला महान कसं करता येईल, याचा विचार केला पाहिजे. त्या दिशेने पुढे गेले पाहिजे. मी स्पष्ट सांगतो की,भारतीय ज्ञान परंपरेचा उद्देश विश्व कल्याणाचा आहे. परंतु त्यांचा उद्धेश तसा नव्हता. त्यांचा उद्देश हा अनेक वर्ष लोकांवर शासन करण्याचा होता, असे त्यांनी पुढे सांगितले.