कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात, 10 जण जखमी, थरकाप उडवणारं दृश्य
Ratnagiri Accident: रत्नागिरीत एका वाहनाचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 10 गणेशभक्त गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काही जण मुंबईतून कोकणात रवाना झाले आहेत. कोकणात आपल्या गावी निघालेल्या काही गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात माहिती समोर आली आहे. राजापूर हातिवले येथे हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये आठ ते दहा जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीची अवस्था इतकी गंभीर आहे की यावरुन समजते की अपघाताच्या भीषणता किती असेल. अद्याप या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गणपती उत्सवासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या फोर्स अर्बेनिया वाहनाचा अपघात झाला. राजापूर तालुक्यातील हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर हा भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या वाहनातून अंदाजे १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याचे समजत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरुवात झाली आहे.
उद्या 14 सप्टेंबर 2026 ला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोकणातील बहुतांश घरांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन होते. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात लाखो चाकरमनी मुंबई, पुणे, नाशिक येथून कोकणात जातात. यंदाही लाखो चाकरमनी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे गेल्या काही तासांपासून मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीही झाली आहे. इंदापूर, माणगाव येथे प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने 10 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास लागत आहेत. तरीही गणपती बाप्पासाठी कोकणात निघालेल्या भाविकांचा उत्साह इतका आहे की ते मोठ्या संख्येने कोकणाच्या दिशेने रवाना होत आहे. मात्र, या सगळ्या उत्साहाला या अपघातामुळे गालबोट लागले आहे. कोकणात निघालेल्या अनेक एक्स्प्रेस ट्रेनही वेळाने धावत आहेत. त्यामुळे कोकणवासियांचे प्रचंड हाल होत आहे.
