लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला, अमित ठाकरे यांचा सरकारविरोधात संताप, पोस्ट शेअर करत..
दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर आता अमित ठाकरे यांनी टीका केली. त्यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. विद्यार्थ्यांवर आलेल्या अन्यायावर ते बोलताना दिसत आहेत.

जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू आहे. काल काही विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल झाली. या विद्यार्थ्यांसाठी काही राजकीय लोक पुढे येऊन भूमिका मांडताना दिसत आहेत. संजय राऊतांनीही सरकारवर जोरदार टीका केली. हेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन विरोधा पक्षाने हातात घ्यावे, असेही आवाहन राऊतांनी केले. याबाबत आता अमित राज ठाकरे यांनीही भूमिका घेतली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला!
20 हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठ्या चालवल्यात? बंदुका दाखवून त्यांना अडवलंत? 15-15 वर्षांच्या मुलांची डोकी फोडली? अश्रूधूर सोडला? सत्तेची ही कसली मस्ती आलीये सरकारला? देशात लोकशाही उरलीये की निव्वळ दडपशाही सुरू आहे?
पुढे अमित ठाकरे यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदी तुडवलं गेलं. सोनम वांगचुक सरांच्या पत्नीशी गैरवर्तन केलं गेलं आणि अनेक तरुणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं.
देशात शांतपणे न्याय मागणाऱ्यांची ही अवस्था? ही कसली गुंडगिरी सुरू आहे??? पेपर फोडून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे दलाल तुमच्या राज्यात मोकाट फिरतात आणि हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुणाला काल तुम्ही बेशुद्ध होईपर्यंत मारलंत? तुमच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून पोलिसांच्या मागे लपून मुलांची डोके फोडताय? सत्तेचा हा कसला माज?
स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत या सरकारमध्ये उरलेली नाही, म्हणूनच असा अमानुष पोलीस बळाचा वापर केला गेला. लोकांच्या मतांवर निवडून आलेलं सरकार असं चालत नसतं. खरंच…लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.