…तर त्याला रट्टा दिला पाहिजे, बच्चू कडू असं का म्हणालेत

| Updated on: Dec 16, 2022 | 8:45 PM

जाणून-बुजून कोणी काही चुकीचं बोलत असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. कोणत्याही पदावर असो. त्याला रट्टा दिला पाहिजे.

...तर त्याला रट्टा दिला पाहिजे, बच्चू कडू असं का म्हणालेत
बच्चू कडू
Follow us on

अमरावती : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर आता राजकारण तापलं आहे. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत यावर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत खूप पत्रकार परिषद घेतात. पत्रकारही त्यांना खूप प्रश्न विचारतात. त्यांनी आता चूक दुरुस्ती केली पाहिजे व माफी मागितली पाहिजे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशच्या महू गावात झाला. त्या गावातसुद्धा त्यांनी जाऊन आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

महाविकास आघाडी महापुरुषांच्या सन्मानासाठी आंदोलन करत आहेत. ही चांगली बाब आहे. महापुरुषांचा अपमान कुणी करू नये. आता संजय राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माबाबात चुकीचं विधान केलं. शब्द चुकणं आणि जाणून बुजून बोलणं हा मोठा फरक आहे. जाणून-बुजून कोणी काही चुकीचं बोलत असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. कोणत्याही पदावर असो. त्याला रट्टा दिला पाहिजे.

जाणून-बुजून कुणीही महापुरुषांबद्दल भांडवल करू नये, असं माझं मत आहे. आपण बोलताना शब्द जपून वापरला पाहिजे. बोलताना कधी-कधी चुकीचं निघतं. त्याबद्दल क्षमा मागायची असते. झालेली चूक कबुल केली पाहिजे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

त्यांनी दिलगिरी व्यक्त केली

राज्यपाल यांची बदली करावी, यासाठीचा हा महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. राज्यपाल चुकीचं बोलले असतील, तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही राज्यपाल बोलले होते. हे काही बरोबर नाही. मोठ्या पदावरील व्यक्तीनं असं बोलणं योग्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.