25 वर्ष विना अपघात सेवा देणार्‍या एसटी चालकांना 25 हजारांचे बक्षीस, अनिल परबांची मोठी घोषणा

| Updated on: Jan 18, 2021 | 10:32 PM

"ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना  यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल", अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली (Anil Parab big announcement for ST Drivers)

25 वर्ष विना अपघात सेवा देणार्‍या एसटी चालकांना 25 हजारांचे बक्षीस, अनिल परबांची मोठी घोषणा
Follow us on

मुंबई :  “ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना  यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल”, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. “चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांचेही आपण कौतुक करायला पाहिजे”, असेही मत त्यांनी व्यक्त केले (Anil Parab big announcement for ST Drivers).

सुरक्षित प्रवास हेच प्रमुख ध्येय असलेल्या एसटी महामंडळाकडून 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते  सुरक्षितता मोहीम राबवली जाणार  आहे. या मोहिमेचे  उद्घाटन  सोमवारी परिवहन मंत्री आणि  एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे  पार पडले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एसटी महामंडळाची 31 विभागीय कार्यालये आणि 250 आगारात करण्यात आले होते (Anil Parab big announcement for ST Drivers).

यावेळी  एसटी महामंडळात गेली 25 वर्षाहून अधिक काळ विना अपघात सेवा देणारे भारत कोल्हे, कीर्ती कुमार पाटील, परशुराम बंडेकर, सुदेश समुद्रे, महादेव जगधने या मुंबई विभागातील 5 चालकांचा मंत्री परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

विना अपघात गाडी चालविणाऱ्याचा मला अभिमान आहे. एसटीचे चालक हे उत्तम प्रशिक्षित चालक असतात. राज्यातील प्रत्येक आगारात असे अनेक चालक आहेत, ज्या चालकांनी 25 वर्ष विना अपघात सेवा दिली आहे. त्यांना यापुढे 25 हजार रुपये  रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, असे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले. तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या स्तरावर जे प्रयत्न केले जातात, त्या प्रयत्नांना यश लाभो आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागो, अशी आशा  मंत्री परब यांनी व्यक्त केली.

केवळ एसटीच्या प्रवांशाचेच नव्हे तर रस्त्यावरील चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून सर्व प्रकारच्या लहान मोठ्या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवांशाची सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संस्कार एसटीच्या चालकांच्यावर रुजविणे हा रस्ते सुरक्षितता अभियानाचा मुख्य  उद्देश आहे, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  शेखर चन्ने म्हणाले.

हेही वाचा : महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : बडनेरा मतदारसंघात 90% ग्रामपंचायतींवर युवा स्वाभिमानचा झेंडा; नवनीत राणा म्हणतात…