संतोष देशमुख हत्या प्रकरण : तो बडा नेता कोण? अंजली दमानियांच्या नव्या ट्विटनं खळबळ

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या ट्विटनंतर चर्चेला उधाण आलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण : तो बडा नेता कोण? अंजली दमानियांच्या नव्या ट्विटनं खळबळ
| Updated on: Dec 29, 2024 | 6:05 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता वीस दिवस झाले आहेत.  मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये, त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांंनी केलेल्या नव्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

‘सीआयडी ला स्कॉर्पियो गाडी मधे २ मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकवर करण्यात येत आहे, त्यामेधे संतोष देशमुख ना मारहाण करतानाचे वीडियो आहेत पण एका बड्या नेत्याचा फ़ोन गेला हे देखील आहे…. कोण आहे हा बडा नेता तत्काळ नव जाहीर करा’ असा सवाल करणारं ट्विट दमानिया यांनी केलं आहे. त्यामुळे हा बडा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

प्रकरण तापलं

संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला वीस दिवस उलटले आहेत, मात्र या प्रकरणातील काही फरार आरोपींना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाहीये, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शनिवारी बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर पकडावं, वाल्मिकी कराड यांना अटक करावी तसेच जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या मोर्चातील नेत्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात आता अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांच्या नव्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.