अखेर मोदी सरकारविरोधात अण्णा दिल्लीत आंदोलन करणार

| Updated on: Dec 26, 2020 | 6:49 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.

अखेर मोदी सरकारविरोधात अण्णा दिल्लीत आंदोलन करणार
Follow us on

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. अण्णा हजारे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार आहेत. यासाठी त्यांनी दिल्ली येथील रामलीला किंवा जंतर-मंतर मैदानात आंदोलनासाठी परवानगी देखील मागितली आहे (Anna Hazare declared to protest against Modi Government on Farmer issue in Delhi).

अण्णा हजारे यांनी आपलं शेवटचं आंदोलन हे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असंही म्हटलं आहे. याआधी शेतकरी आंदोलनावर अण्णा हजारे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. याआधी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे आणि नंतर खुद्द गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली होती. तसेच अण्णांनी शेतकरी आंदोलनात भाग घेऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही अण्णा असं काही आंदोलन करणार नाहीत असं म्हटलं होते. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी घेतलेला आंदोलनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला

दरम्यान, याआधी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे येऊन भेट घेतली होती. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपचे संकटमोजक गिरीश महाजन यांनी स्वतः अण्णा हजार यांची भेट घेतली होती.

काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. तसे पत्रही अण्णांनी केंद्र सरकारला पाठवले होते. यापूर्वी 21 डिसेंबर रोजी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी देखील अण्णांची भेट घेऊन मनधरणी केली होती. त्यानंतर गिरीश महाजनही अण्णा हजारे यांना भेटायला गेले होते. त्यामुळे अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन न करण्यासाठी थेट केंद्रातून हालचाली सुरु असल्याचं बोललं जात होतं.

महाजनांकडून यापूर्वीही अण्णा हजारेंशी यशस्वी शिष्टाई

30 जानेवारी 2019 रोजी अण्णांनी केलेले उपोषण सोडण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजनही अण्णा हजारे यांच्याकडे आले होते. यावेळी अण्णांना आश्वासन देण्यात होते. मात्र, अद्यापही अण्णांच्या मागण्या मान्य न झाल्याने अण्णांनी नव्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांनी केलेल्या मागण्या रास्त असून केंद्र सरकारही त्याच मार्गाने जात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. तसेच अण्णा हजारे यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला होता.

कृषी कायद्यांबाबत अण्णा हजारे समाधानी?

कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आणि कायदे मागे घेण्याबाबत अण्णा हजारे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. केवळ कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतीलच असे नसून, दिल्लीतील आंदोलन हे सिमीत आहे, असे मत त्यांनी नुकतेच व्यक्त केले होते.

मात्र, अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसाठी आंदोलन छेडल्यास भाजपची राजकीय कोंडी होऊ शकते. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषण केले होते. या आंदोलनाला देशव्यापी प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे काँग्रेस सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. ही शक्यता लक्षात घेता भाजप यावेळी अण्णा हजारे यांच्याबाबत कोणताही धोका पत्कारण्यास तयार नाही.

हेही वाचा :

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

Anna Hazare declared to protest against Modi Government on Farmer issue in Delhi