भेंडवळच्या पावसाबाबतच्या भविष्यवाणीला थेट चॅलेंज, अंदाज अचूक ठरल्यास 80 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा?

Bhendwal Prediction : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मात्र भेंडवळ व ज्योतिषशास्त्राला आव्हान दिले आहे. त्यांनी भविष्यवाणीची 90% अचूकता सिद्ध केल्यास आणि 80 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भेंडवळच्या पावसाबाबतच्या भविष्यवाणीला थेट चॅलेंज, अंदाज अचूक ठरल्यास 80 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा?
Shyam Manav
Image Credit source: Google
| Updated on: Apr 20, 2026 | 4:01 PM

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. यात पाऊस किती पडणार? राजकीय परिस्थिती काय असेल? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत. घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ-उताराची राहणार असल्याचे समोर आले आहे. अशातच आता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मात्र भेंडवळ व ज्योतिषशास्त्राला आव्हान दिले आहे. त्यांनी या भविष्यवाणीची 90% अचूकता सिद्ध करा आणि 80 लाखांचे बक्षीस घेऊन जा असं म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किती पाऊस पडणार?

यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल. यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल. तिसरा महिना घातक ठरु शकतो. या महिन्यात जलप्रलय होण्याची शक्यता आहे.यानंतर चौथ्या महिन्यातही पाऊस चांगला पडेस अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

भेंडवळच्या भविष्यवाणीला चॅलेंज

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळ, कुंडली व पारंपरिक ज्योतिषशास्त्राच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित करत खुले आव्हान दिले आहे. मानव यांनी, ’10 कुंडल्या आणि सध्याची माहिती देऊ, त्यापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त भविष्यवाणी अचूक ठरवून दाखवा, ते सिद्ध झाल्यास तब्बल 80 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

लोकांना फसवण्यासाठी श्रद्धेचा वापर होतो – मानव

श्याम मानव यांनी पुढे बोलताना म्हटले की, आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित असून त्या पडताळून पाहता येतात. मात्र भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तितकी शास्त्रीय पडताळणी नाही. पूर्वी शेतकरी अनुभवावर निर्णय घेत होते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलली आहे. यावेळी काही धार्मिक व पारंपरिक प्रथांवरही त्यांनी टीका केली. ‘लोकांना फसवण्यासाठी श्रद्धेचा वापर होतो’ असा आरोप करत अशा प्रथांविरोधात जागृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक व धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

Follow Us