
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी : भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी कोर्टासमोर खरातला ‘मास्टरमाइंड’ म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र, यावेळी सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देताना खरातच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद केला आणि खरात ‘पुरता फसला’ असल्याचे स्पष्ट संकेत दिले. आज कोर्टात अशोक खरातला कोणत्या तीन मुद्द्यांवरुन घेरलं गेलं वाचा..
पोलीस कोठडी का हवी?
तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की,
-आरोपीचा आणखी कोणी साथीदार आहे का, याची चौकशी करायची आहे.
-त्याच्या मोबाइलमधील रिकव्हर झालेला डेटा समोरासमोर घेऊन चौकशी करायची आहे.
-त्याने खरेदी केलेली जंगम मालमत्ता आणि सर्व प्रॉपर्टीची माहिती घ्यायची आहे.
-पीडितांना दिलेले पाणी, पेढे आणि इतर खाद्यपदार्थ यांचाही तपास करायचा आहे.
“प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष या प्रकरणाकडे आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. अनेक पीडित धाडस करून समोर येऊन जबाब देत आहेत. म्हणून आम्हाला आणखी तीन दिवस पोलीस कोठडीची गरज आहे,” असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला.
खरातच्या वकीलाने दिले जबरदस्त प्रत्युत्तर
खरातच्या वकिलाने मात्र सरकारी युक्तिवादाला चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “आरोपीने आतापर्यंत तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. मागील रिमांडमध्येही पोलिसांनी पेन ड्राईव्ह, व्हिडीओ, जंगम मालमत्ता याच गोष्टी सांगितल्या होत्या. आजही वेगळे ठोस कारण सांगितले जात नाहीये. त्यामुळे हा फक्त वेळकाढूपणा आहे.”
वकील पुढे म्हणाले, “जप्त मुद्देमालात पैसे, लॅपटॉप, एक मोबाइल, काळ्या रंगाची रिवॉल्व्हर (जिचा रीतसर परवाना आहे), जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या शेल्स यांचा तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित गोष्टींसाठी आता आरोपीच्या कोठडीची गरज नाही.”
कोर्टात कडक सुरक्षा व्यवस्था
खरातला पोलीस उपायुक्त कार्यालयातून तब्बल ३२ मिनिटांनंतर कोर्टाकडे रवाना करण्यात आले. त्याच्यासोबत पाच गाड्यांचा ताफा होता. सहाय्यक पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी या पथकाचे नेतृत्व करत होते. माध्यम प्रतिनिधींना कोर्टाच्या आवारात प्रवेश नाकारण्यात आला. खरातला कोर्टाच्या मागील बाजूने आत आणण्यात आले. या प्रकरणात खरातने अनेक महिलांना भामटेगिरी आणि भोंदुगिरीच्या नावाखाली फसवल्याचे आरोप आहेत. त्याने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. आता कोर्टाचा निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण नाशिक आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.