अशोक खरातच्या अडचणी वाढल्या, 5 बड्या व्यक्तींच्या मदतीने…; मोठी अपडेट समोर
अशोक खरातने अध्यात्माच्या नावाखाली ३०० कोटींची मालमत्ता जमवली असून १५ गुन्हे दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे जाण्याची चिन्हे आहेत.

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. स्वत:ला अध्यात्मिक गुरु म्हणणाऱ्या अशोक खरात याने सर्वसामान्य नागरिक नव्हे तर अनेक बडे उद्योजक आणि बिल्डर्सही अडकल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आंतरराज्य आर्थिक गुन्हेगारीचे स्वरूप प्राप्त झाले असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
नाशिक आणि पुण्यातील पाच बड्या व्यक्ती कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात प्रकरणी केलेल्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अशोक खरातने एका नामवंत बिल्डरसोबत झालेला ३०० कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती आहे. हा पैसा नेमका कुठून आला आणि तो कुठे वळवण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक आणि पुण्यातील पाच बड्या व्यक्ती या खरातच्या मदतीने हे हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशोक खरात हा आशीर्वाद आणि विधी करण्याच्या नावाखाली भाविकांकडून रोख रक्कम घ्यायचा. त्यानंतर मग हवाला मार्गे ती वळवण्यात येत होती, अशी माहिती समोर आली आहे.
अशोक खरातने केवळ रोख रक्कमच घेतली नाही, तर अनेक मोक्याच्या जमिनींवरही डल्ला मारला आहे. तपासातील अंदाजानुसार, अशोक खरातने आपल्या प्रभावाचा वापर करून अनेक शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना धाकात घेऊन त्यांच्या जमिनी हडपल्या आहेत. या जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाची गुंतवणूक करण्यात आली आहे. यात काही राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देवदर्शनासाठी कर्नाटकात न्यायाचा अन्…
याप्रकरणी पोलिसांनी खरातचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले असून, त्यातील व्हॉट्सॲप चॅट्स आणि ऑडिओ क्लिप्स महत्त्वाचे दुवे ठरत आहेत. या क्लिप्समध्ये पैशांच्या वसुलीसाठी दिलेल्या धमक्या, हवाला व्यवहारांच्या सूचना आणि बनावट कागदपत्रांची चर्चा असल्याचे समजते. या तांत्रिक पुराव्यांमुळे अशोक खरातला स्वत:चा बचाव करणे कठीण झाले आहे. अशोक खरातचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तो भक्तांना देवदर्शनासाठी कर्नाटकात नेले जायचे. तिथे गेल्यानंतर, या लोकांच्या नकळत त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरून बनावट बँक खाती उघडायचा. या खात्यांचा वापर करून सहकारी पतसंस्थांमधून कोट्यवधींचे व्यवहार केले गेले, जेणेकरून मुख्य सूत्रधार पोलिसांच्या नजरेतून वाचू शकतील.
दरम्यान अशोक खरात प्रकरणी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अध्यात्म आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार पाहता, याची ED (सक्तवसुली संचालनालय) मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा सहभागी होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत नाशिक आणि अहमदनगरमध्ये मिळून १५ गुन्हे दाखल झाले आहेत. नुकताच नगरमध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात त्याने एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याच्या आर्थिक स्त्रोतांचा आणि बेनामी मालमत्तेचा शोध घेत आहेत.