Rajya Sabha Election : उरले चार दिवस, पण एमआयएम काहीच बोलेना, निर्णय ओवैसीच घेणार; आघाडीचं टेन्शन वाढलं!

| Updated on: Jun 06, 2022 | 2:00 PM

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एमआयएम राज्य सरकारवर नाराज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Rajya Sabha Election : उरले चार दिवस, पण एमआयएम काहीच बोलेना, निर्णय ओवैसीच घेणार; आघाडीचं टेन्शन वाढलं!
इम्तियाज जलील, खासदार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) अपक्ष आणि छोट्या पक्षांना अधिक महत्त्व आल्याने या आमदारांचा भावही वाढला आहे. सरकार बनविताना महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) पाठिंबा देणाऱ्या या आमदारांकडे अडीच वर्ष दुर्लक्ष करण्यात आलं. राज्यात केवळ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीच (congress) सत्ता असल्याचं चित्रं निर्माण करण्यात आलं. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आलं नाही. त्यामुळे आता या छोट्या पक्षांनी राज्यसभेच्या निवडणुकीचं औचित्य साधून आघाडी सरकारला टेन्शन देण्यास सुरुवात केली आहे. रोज कुठला ना कुठल्या छोट्या पक्षाचा आमदार उठतो आणि आघाडी सरकारला इशारा देताना दिसत आहे. किंवा आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवून आघाडीला घामटा फोडताना दिसत आहे. एमआयएमनेही आपले पत्ते अजून खोलले नाहीत. त्यावर थेट भाष्य करण्यासही एमआयएमचे नेते टाळत आहेत. त्यामुळे आघाडीचं टेन्शन अधिकच वाढताना दिसत आहे.

ठाकरे ओवैसींशी बोलणार?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एमआयएम राज्य सरकारवर नाराज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार निधी वाटपात पक्षपात करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एमआयएमच्या आमदारांना किंवा खासदारांना निधीच देत नसल्याचं ते म्हणाले. मात्र राज्यसभा निवडणुकीत कुणाला मतदान करणार हे जलील यांनी सांगितलं नाही. याबाबत पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओवैसींना फोन करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एमआयएमचे राज्यात दोन आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांना अधिक महत्त्व आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वात आधी सपाचा झटका

महाविकास आघाडीला सर्वात आधी समाजवादी पार्टीने झटका दिला. समाजवादी पार्टीत सरकारमध्ये आहे. सपाचे दोन आमदार आहेत. पण अल्पसंख्याकांच्या विकासाच्या आणि मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीने महाविकास आघाडील घेरलं आहे. त्यांनी या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे दोन्ही आमदार मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

बविआचा भाजपला पाठिंबा

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीही महाविकास आघाडीसोबत होती. पण राज्यसभा निवडणुकीत बविआने भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिकही हितेंद्र ठाकूर यांना भेटून गेले होते. तर काल शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि खासदार राजन विचारे यांनी ठाकूर यांची भेट घेऊन तब्बल चार तास चर्चा केली. बंददाराआड ही चर्चा झाली. मात्र, ठाकूर यांनी या चर्चेनंतर कौटुंबीक चर्चा असल्याचं सांगून काहीही बोलण्यास नकार दिला.