सदावर्ते म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पाळलेला श्वान; ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सदावर्ते हे सत्ताधाऱ्यांचे पाळलेले श्वान असून, विशिष्ट वेळीच सक्रिय होतात, असा आरोप दानवे यांनी केला. मराठा आरक्षणावरील सरकारची भूमिका, डीजे बंदी आणि पावसासाठी तुळजाभवानीला घातलेले साकडे यावरही त्यांनी भाष्य केले.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणजे राज्यातील सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांनी पाळलेलं श्वान आहे. तसं म्हणायला काही हरकत नाहीये. ज्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचं आदोलन झालं, तेव्हा उद्धव ठाकरे यांची सत्ता होती. तेव्हा सदावर्ते शरद पवारांच्या निवासस्थानापर्यंत गेले होते. आता देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. आता सदावर्ते घरात बसले आहेत का? उपोषणाला का बसत नाही? आता का त्याचं थोबाड बंद पडलं? असा हल्लाच अंबादास दानवे यांनी चढवला आहे.
आमदार अंबादास दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना सदावर्ते यांच्यावर खरपूस शब्दात टीका केली. मराठा आरक्षणासाठी जेव्हा जेव्हा आंदोलन सुरू होतं. तेव्हा सदावर्तेच का पुढे येतात. सरकारच याला पाठवते हा माझा आरोप आहे. हा पाळलेला माणूस आहे, अशी घणाघाती टीकाही अंबादास दानवे यांनी केली. दानवे धाराशिवमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्यात पाऊस पडावा आणि राज्य डीजे मुक्त व्हावं, असं साकडं तुळजा भवानी देवीला घातलं.
युद्ध पातळीवर निर्णय घ्या
दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने युद्ध पातळीवर निर्णय घेणे गरजेचे आहे. राज्याचा प्रश्न असताना एका कलेक्टरला जरांगे पाटलांबरोबर चर्चेला पाठवले जात आहे. हे योग्य नाही, अशी टीका दानवे यांनी केली.
पारंपारिक वाद्य वाजवा
यावेळी त्यांनी डीजे बंदीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. गणेश उत्सव डीजे मुक्त झाला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू केला, त्याचा हेतू संस्कृती रक्षणाचा होता. डीजेवर नाचण्याचा नव्हता. त्यामुळे सर्वांनी डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
तुळजा भवानीला साकडं
दानवे यांनी तुळजा भवानी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. राज्यात पाऊस पडू दे, असं साकडं त्यांनी देवीला घातलं. शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे गेलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय पाऊस असल्यामुळे मी तुळजाभवानीला पाऊस पडावा म्हणून साकडे घातले, असं त्यांनी सांगितलं.