Aurangabad : ज्या औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी दम दिला, तिथं नेमकी अजान आज कशी झाली? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

| Updated on: May 04, 2022 | 10:05 AM

मशिदींवरील आजच्या अजानकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र औरंगाबादमध्ये पहाटेच्या वेळी पार पडलेल्या अजानचा आवाज अत्यंत कमी होता. त्यामुळे मनसेच्या वतीने मुस्लिम भाविकांचे आभार मानले गेले.

Aurangabad : ज्या औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी दम दिला, तिथं नेमकी अजान आज कशी झाली? वाचा ग्राऊंड रिपोर्ट
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) अनेक मशिदींमध्ये आज कमी आवाजात अजान देण्यात आली. शहरातील बहुतांश मशिदींमध्ये हेच चित्र दिसले. तर काही मशिदींमध्ये भोंग्यांशिवाय (Loud speakers) अजान पार पडली. मुस्लिम भाविकांनी (Muslim Devotees) कमी आवाजात अजान लावल्यामुळे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे आभार मानले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 04 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवरच मनसेने हा इशारा दिला असून तो न पाळल्यास तीव्र प्रतिक्रिया देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र राज्यातील इतर भागांप्रमामेच औरंगाबादमध्येही विविध मशिदींवरील आजची अजान अत्यंत कमी आवाजात देण्यात आली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही मुस्लिम भाविकांचे आभार मानले. मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी ट्विट करून औरंगाबादमधील नागरिकांचे आभार मानले. मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचाही कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मनसेकडून औरंगाबादकरांचे आभार!

महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची ऐतिहासिक सभा पार पडल्यानंतर औरंगाबादसारख्या संवेदनशील शहरात त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर येत्या 04 मे पर्यंत मशिदींवरचे लाऊडस्पीकर काढण्यासाठीचा अखेरचा अल्टिमेटमही देण्यात आला होता. याच सभेत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लाऊड स्पीकर हटवले नाहीत तर थेट ते हटवण्यासाठी पुढाकार घ्या, असे आदेश दिले होते. त्यामुळे औरंगाबादमध्येच या आदेशाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं जाईल तसेच मुस्लिम भाविक याला विरोध करणार नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर मशिदींवरील आजच्या अजानकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र औरंगाबादमध्ये पहाटेच्या वेळी पार पडलेल्या अजानचा आवाज अत्यंत कमी होता. त्यामुळे मनसेच्या वतीने मुस्लिम भाविकांचे आभार मानले गेले. ज्यांनी आमच्या विचारांना पाठिंबा दिला, त्यांचे आभार, अशा आशयाचं ट्विट मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केलं आहे.

मनसेचे अनेक कार्यकर्ते भूमिगत

दरम्यान, मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात दंगलसदृश्य स्थिती निर्माण होऊ नये म्हणून, महाराष्ट्र पोलिसांतर्फे कालपासूनच मनसैनिकांची तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची धरपकड सुरु झाली आहे. राज्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. औरंगाबादमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनाही 149 ची नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे अटक होऊ नये, यासाठी मनसे कार्यकर्ते भूमिगत झाले. जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राजीव जावळीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते भूमीगत झाले आहेत. दरम्यान, शहरात पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त असून मशिदींसमोर शांतता आहे.