औरंगाबादने इतिहास रचला, एकदाच 250 इलेक्ट्रिक वाहने बुक, पहिल्या 101 वाहनांचे वितरण, मिशन ग्रीन मोबिलिटी वेगात!

स्मार्ट सिटीच्या वतीने ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत असून 60 नवीन ईव्ही स्मार्ट शहर बसेस दाखल केल्या जाणार आहेत. ईव्ही कारसाठी शहरात 200 पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येत आहेत,

औरंगाबादने इतिहास रचला, एकदाच 250 इलेक्ट्रिक वाहने बुक, पहिल्या 101 वाहनांचे वितरण, मिशन ग्रीन मोबिलिटी वेगात!
मिशन ग्रीन मोबिलिटी अंतर्गत101 ईव्ही ग्राहकांना वाहन वितरित करताना टाटा ग्रुपचे अधिकारी
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून मिशन ग्रीन मोबिलिटी (Mission Green Mobility) अंतर्गत औरंगाबादच्या उद्योजकांनी प्रदूषण निर्मुलनाची (Pollution free) मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या काही महिन्यात तब्बल 250 चारचाकी इलेक्ट्रिक वाहने बुक करण्यात आली आहेत. त्यापैकी 101 इलेक्ट्रिक वाहनांचे नुकतेच वितरण करण्यात आले. औद्योगिक उत्पादने (Industrial products) आणि ऑटोमोबाइल हब म्हणून ओळख मिळवणाऱ्या औरंगाबादने आता प्रदुषण मुक्तीकडे वाटचाल सुरु केली असून लवकरच शहराने नियोजित केलेले उद्दिष्ट साध्य होईल. एक दिवस औरंगाबाद हे प्रदुषणमुक्त, हरित आणि स्वच्छ शहर असेल. तसेच ईव्ही हबदेखील होईल, असे प्रतिपादन टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी केले. शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे हा कार्यक्रम पार पडला.

मिशन ग्रीन मोबिलीटी काय आहे?

शहरातील मिशन ग्रीन मोबिलिटीविषयी माहिती देताना उल्हास गवळी म्हणाले, काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणाच्या कारणावरून औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात काही निर्बंध लावले होते. यावर तोडगा काढत असताना प्रदूषण मुक्त, हरित आणि स्वच्छ औरंगाबाद व औद्योगिक परिसर करण्यासाठी मिशन ग्रीन मोबिलिटी या मिशनला सुरुवात करण्यात आली. उद्योजक आणि शहरातील नागरिकांनी याला प्रचंड प्रतिसाद गिला. त्यामुळे अल्प काळातच औरंगाबादने या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पहिल्या टप्प्यात कार, नंतर इलेक्ट्रिक तीन चाकी, दुचाकी आणि बसेस रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न आहे.

शहरात 200 पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन उभारणार

या कार्यक्रमात मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय म्हणाले, स्मार्ट सिटीच्या वतीने ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत असून 60 नवीन ईव्ही स्मार्ट शहर बसेस दाखल केल्या जाणार आहेत. ईव्ही कारसाठी शहरात 200 पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उद्योगपती राम भोगले, मानसिंग पवार, शिवप्रसाद जाजू, प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे, ऋषी बागला, मुनीष शर्मा, गिरधर संगेरीया, डॉ. उल्हास गवळी, प्रशांत देशपांडे, सचिन मुळे, अभय हंचनाळ व मनीष धूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Metro Recruitment 2022 : नागपूर मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 33 हजार ते 2.60 लाखापर्यंत पगार

Manoj Katke : डोंबिवलीतील मनोज कटके हल्ला प्रकरण, भाजपचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण