Aurangabad | ठाकरे सरकारचा निर्णय, औरंगाबाद काँग्रेसमध्ये भडका, एकाच वेळी 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

| Updated on: Jun 30, 2022 | 3:29 PM

आधीच शिवसेना आणि भाजपच्या प्रभावाखाली असलेल्या औरंगाबादमध्ये काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाला आता मोठी मोहीम हाती घ्यावी लागणार, असेच चित्र आहे.

Aurangabad | ठाकरे सरकारचा निर्णय, औरंगाबाद काँग्रेसमध्ये भडका, एकाच वेळी 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वीच्या महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीत  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Aurangabad name Sambhajinagar) करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील सत्ता गेली तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या (Aurangabad municipal corporation) पार्श्वभूमीवर शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला, मात्र याचे स्थानिक राजकारणावर मोठे पडसाद दिसून येत आहेत. कालच औरंगाबाद काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिला. उस्मानींपाठोपाठ काँग्रेसमधील इतर मुस्लीम पदाधिकाऱ्यांनीही धडाधड राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. काल निर्णय झाला आणि आज गुरुवारी काँग्रेसच्या तब्बल 22 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. हिशाम उस्मानी यांचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वीकारतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘ऐतिहासिक ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न’

काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उसमानी यांनी संभाजीनगर नामांतराचा निर्णय झाल्यानंतर काही वेळातच आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर झाल्यामुळे आणि अनेक औरंगाबादकरांप्रमाणे आपली ऐतिहासिक ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मलाही वेदना झाल्या आहे. व्यथित झाल्यामुळे मी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सोपवला आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर बाळगून मी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय पूर्णपणे नाकारतो, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली.

200 पदाधिकाऱ्यांनी पद सोडले

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे दिले राजीनामे
हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसमधील 200 मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. शहराध्यक्ष, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष, माजी शहराध्यक्ष यांच्यासह 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबाद काँग्रेसमध्ये पेटलेली ही आग विझवणं प्रदेशाध्यक्षांसमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे. आधीच शिवसेना आणि भाजपच्या प्रभावाखाली असलेल्या औरंगाबादमध्ये काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाला आता मोठी मोहीम हाती घ्यावी लागणार, असेच चित्र आहे.

MIM चीही काँग्रेसवर टीका

कालच्या कॅबिनेट बैठकीत जेव्हा औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत होती, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मौन पत्करले होते. याचे तीव्र पडसाद औरंगाबादच्या स्थानिक काँग्रेसमध्ये तसेच एमआयएमवर दिसून येत आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही काँग्रेस नेत्यांवर टीका करत आता औरंगाबादमध्ये येऊन तर पहा, तुमचं कसं स्वागत करतो, असा इशारा दिला आहे.