दानवे, देशाचे रेल्वेमंत्री आहात की जालन्याचे? इम्तियाज जलील यांचा सवाल, कोणत्या मुद्द्यावरून खासदार खवळले?

| Updated on: Jan 04, 2022 | 12:12 PM

औरंगाबाद येथे होऊ घातलेली रेल्वेची पीटलाईन जालन्याला नेण्यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलेच सुनावले.

दानवे, देशाचे रेल्वेमंत्री आहात की जालन्याचे? इम्तियाज जलील यांचा सवाल, कोणत्या मुद्द्यावरून खासदार खवळले?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलील
Follow us on

औरंगाबादः केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी औरंगाबाद येथे होऊ घातलेली रेल्वेची पीटलाईन जालन्यात हलवल्याचा आरोप केला जातोय. जालन्यात एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी पीटलाईनसंदर्भात घोषणा केली. यावर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच भडकले. रावसाहेब दानवे हे देशाचे रेल्वेराज्य मंत्री आहेत की जालन्याचे हे एकदा सांगावे, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय.

काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील?

औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, औरंगाबाद येथे होणारी रेल्वे पीटलाईन दानवे यांनी त्यांच्या मतदार संघात नेली. त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न करतोय की तुम्ही देशाचे मंत्री आहात की जालन्याचे ? जालन्याचे मंत्री असाल तर तुम्ही पुढच्या वेळी तुम्ही खासदारकीचा निवडणूक न लढवता महानगरपालिका किंवा नगरपरिषदेची निवडणूक लढवावी. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे. एक ड्रायपोर्ट जालन्यात असतानादेखील रेल्वेची पीटलाईन पुन्हा जालन्यात नेली जात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनीच या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

काय आहे रेल्वे पीटलाइनचा वाद?

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचे स्टेशन म्हणून औरंगाबादची ओळख आहे. त्यामुळे येथे रेल्वेची पीटलाइन असावी, अशी मागणी आहे. पीटलाईन म्हणजे अतिरिक्त रूळ असतात, ज्यावर रेल्वेची स्वच्छता, दुरुस्ती करणे शक्य होईल. औरंगाबादला पीटलाइन झाल्यास मनमाडला थांबणाऱ्या गाड्या औरंगाबादला थांबतील. येथून नव्या गाड्याही सुरु होतील. त्यामुळे मराठवाड्याची इतर जिल्हे तसेच राज्यांशी कनेक्टिव्हिटी वाढेल. या पीटलाइनसाठी भाजप नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी करमाड येथील जागेचा प्रस्ताव दिला होता. मात्र परवा जालन्यातील एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही पीटलाईन जालना येथे सुरु करत असून जागेचा प्रश्नही सुटला असल्याचे सांगितले. त्यामुळे औरंगाबादच्या वाट्याला ही पीटलाईन येणार नसल्याचे संकेत आहेत. औरंगाबादला देण्यात येणाऱ्या या सापत्न वागणुकीवर खासदार इम्तियाज जलील यांनी उपरोक्त प्रतिक्रिया नोंदवली.

इतर बातम्या-

VIDEO : जब घी सीधी उंगली से ना निकले तो…! मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलीने केला खतरनाक स्टंट, तरूणालाही मिळाली शिक्षा!

VIDEO: जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार; गोपीचंद पडळकर यांची खोचक टीका