औरंगाबादः शहरातील शाळांमध्ये आज खऱ्या अर्थाने किलबिलाट सुरु होणार आहे. कारण आजपासून बालवाडी ते चौथीपर्यंतचे वर्गही सुरु झाले आहेत. महानगरपालिकेच्या (Aurangabad municipal corporation) हद्दीतील शहरातील सर्व शाळांचे बालवाडीपासून ते दहावीपर्यंतचे वर्ग आता सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आज 14 फेब्रुवारीपासून हे वर्ग सुरु झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट (Corona Third wave) आल्यामुळे पंधरा दिवसच सुरु झाल्यानंतर पहिलीपासूनच्या शाळा (Aurangabad schools) पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दहावी, त्यानंतर आठवी नववीचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे वर्ग 7 फेब्रुवारीपासून सुरु झाले तर आज 14 फेब्रुवारीपासून शिशूवर्ग ते चौथीचे वर्ग भरवण्यात येत आहेत.
आजपासून शहरातील कोचिंग क्लासेस पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठीदेखील महानगरपालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे. शाळांच्या बाबतीत ग्रामीणपेक्षाही शहरांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्यक्ष शिक्षणावर भर द्यावा लागणार आहे. शाळा सुरु करताना 48 तासांपूर्वी स्रव शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती, आवश्यकतेनुसार शाळेत टप्प्या-टप्प्याने, एक दिवसाआड बोलवण्यात यावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी नियंत्रणात असल्याचे दिसून आले. तरीही शहर परिसरात 49 तर ग्रामीण भागात 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. रविवारी 204 रुग्णांचा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मागील 24 तासात एकाचाही मृत्यू कोरोनामुळे झाला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 3 हजार 505 नवे रुग्ण आढळून आले. या काळात 17 लोकांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 218 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असून त्यांचा एकूण आकडा 4 हजारांच्या घरात गेला आहे. मराठवाड्यात रविवारी एकूण 271 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. औरंगाबाद वगळता जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
जालना- 4
परभणी- 10
नांदेड- 33
हिंगोली- 07
बीड- 34
लातूर- 51
उस्मानाबाद- 33
इतर बातम्या-