मंत्रालयापाठोपाठ आता औरंगाबाद महापालिकेच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच

| Updated on: Aug 11, 2021 | 8:36 AM

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर औरंगाबादच्या महानगरपालिकेतही दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागात देशी, विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

मंत्रालयापाठोपाठ आता औरंगाबाद महापालिकेच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच
औरंगाबाद महापालिका मुख्यालयाच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच...
Follow us on

औरंगाबाद :  राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला. हा प्रकार ताजा असतानाच आता औरंगाबाद महानगरपालिकेतही दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे शासकीय-प्रशासकीय कार्यालयात नेते-मंडळी किंवा अधिकारी वर्ग काम करण्यासासाठी जातात की ओल्या पार्ट्या करण्यासाठी?, असा उद्विग्न सवाल राज्यातले नागरिक उपस्थित करत आहेत.

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागात देशी, विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर औरंगाबादच्या महानगरपालिकेतही दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागात देशी, विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या आवारात कुणाची ओली पार्टी रंगते? या ओल्या पार्टीत कोण कोण सहभागी असतं?, अशा चर्चा आता औरंगाबाद शहरात सुरु झाल्या आहे.

महापालिकेत काम कमी आणि भलताच उद्योग जास्त!

कार्यालयीन वेळ संपल्यानंतर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातच ओली पार्टी होत असल्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. कारण मुख्य इमारतीच्या भागातच देशी आणि विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत काम कमी आणि भलताच उद्योग जास्त चालतोय, अशा संतप्त प्रतिक्रिया औरंगाबादकर व्यक्त करत आहेत.

मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच

मंत्रालयातील त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का? हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतात कशा? असा प्रश्न आहे.

मंत्रालयात दारुच्या बाटल्या प्रविण दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा, असा सवाल उपस्थित करताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम आणणारी अशी घटना आहे, अशी टीका त्यांनी केली.

(Bottle of liquor Were Found in Aurangabad Municipal Carporation main building)

हे ही वाचा :