Aurangabad Alert: मिठाई खरेदी करताना सावधान, ट्रेवर Best Before Date लिहिलंय का पहा

| Updated on: Sep 10, 2021 | 2:59 PM

मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी (Best Before Date) यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.

Aurangabad Alert: मिठाई खरेदी करताना सावधान, ट्रेवर Best Before Date लिहिलंय का पहा
मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहण्याचे आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Follow us on

औरंगाबाद: गणेशोत्सव काळात शहरातील बाजारपेठेत  उत्साह दिसून येत आहे. घरा-घरांमध्ये गणेशाची स्थापना झाली आहे. आता पुढील दहा दिवस गणराय आपल्यामध्ये विराजमान असतील.या काळात नैवेद्याकरिता बाजारात विविध प्रकारच्या मिठायादेखील विक्री केल्या जातात. मात्र सणासुदीत मिठाई घेताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनातर्फे (Alert while buying sweets) देण्यात आल्या आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी या काळात विविध दुकानांच्या तपासण्या आणि अन्न पदार्थांचे नमूने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही विशेष मोहीम डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

कोणत्या पदार्थांत भेसळ आढळू शकते?

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत विविध प्रकारचे पेढे, मिठाई, खवा, नमकीन आदी पदार्थांमध्ये भेसळ आढळू शकते किंवा हे पदार्थ वापरण्याची तारीख उलटून गेलेली असू शकते. तसेच खाद्यतेल, साजूक तूप, दूध, दही इत्यादी पदार्थांमध्येही भेसळ असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी दुकानात खरेदी करताना ते ताजे पदार्थ आहेत का नाही, हे तपासून घ्यावे.

खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी (Best Before Date) यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. तसेच दूध, खवा, खाद्यतेल, वनस्पती तूप, साजूक तूप हे पदार्थ परवानाधारक, नोंदणीकृत व्यावसायकिांकडून खरेदी करावेत, त्यांची बिलेही सांभाळून ठेवावीत, असेही प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. तसेच ग्राहकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करु नये. खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासांच्या आतच करावे. तसेच ते साठवणूक करण्यायोग्य तापमानात ठेवावे. मिठाईची चव किंवा गंधात फरक जाणवल्यास ती नष्ट करावी, इत्यादी प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त (अन्न) उ.श.वंजारी यांनी केले आहे.

मिठाईविक्रेत्यांसाठी कोणते आदेश?

प्रशासनातर्फे मिठाई विक्रेत्यांसाठीही काही अनिवार्य सूचना देण्यात आल्या आहेत. मिठाई तयार करताना फुड ग्रेड खाद्यरंगाचा 100ppm च्या मर्यादेतच वापर करावा. दुग्धजन्य मिठाई ही आठ ते दहा तासांच्या आतच खाण्याबाबत ग्राहकांना निर्देश द्यावेत. माश्या बसू नये म्हणून अन्नपदार्थावर जाळीदार झाकण टाकावे. स्वतःचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. अन्नपदार्थ तयार करताना एका तेलाचा वापर फार तर दोन किंवा तीन वेळाच करावा. त्यानंतर ते तेल बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे.

नियमभंग केल्यास कारवाई, हेल्पलाइन नंबर कोणता?

अन्नपदार्थ व मिठाई विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2009 मधील तरतुदींचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अन्नपदार्थात भेसळ किंवा फसवणुक केल्याचे आढळल्यास ग्राहकांनी प्रशसनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 0240-2952501 या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Food and safety department has issued an alert for while buying sweets in Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी, औरंगाबादेत बालगणेशाच्या मोहक मूर्तींची भूरळ

Festival Special: औरंगाबादचं आराध्य दैवत संस्थान गणपतीची उत्सवमूर्ती तयार, मूर्तीकार बगले कुटुंबियांचा मान