धक्कादायकः चेकपॉइंटवर तपासणीसाठी बसमध्ये शिरलेल्या कर्मचाऱ्याचेच अपहरण व मारहाण, औरंगाबादमधील घटना

| Updated on: Oct 25, 2021 | 11:11 AM

कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच केंद्रावरील बालाजी ढवळे आणि इतरांनी मोटर सायकलवर पाठलाग सुरु केला. मात्र फार काळ बसच्या मागे जाता आले नाही.

धक्कादायकः चेकपॉइंटवर तपासणीसाठी बसमध्ये शिरलेल्या कर्मचाऱ्याचेच अपहरण व मारहाण, औरंगाबादमधील घटना
झाल्टा फाट्यावरून याच बसमधून कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले.
Follow us on

औरंगाबादः शहरात येणाऱ्या प्रत्येक बसमधील प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याकरिता औरंगाबाद महापालिकेने तपासणी यंत्रणा उभी केली आहे. शहरातील प्रत्येक नाक्यावर (Check Point) प्रवाशांची या पथकाद्वारे तपासणी करण्यात येते. मात्र रविवारी झाल्टा फाट्यावर (Zalta Fata) तपासणीकरिता बसमध्ये चढलेल्या कर्मचाऱ्याचेच अपहरण झाल्याची घटना घडली. एवढच नाही तर ट्रॅव्हल्समधील कामगारांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचे उघड झाले आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही पोलिसांनी (Aurangabad Police) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल 9 तास लावले, यामुळे पोलिसांवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला.

झाल्टा फाट्यावर झाले अपहरण

हैदराबाद-अरुणाचल प्रदेश ही बस रविवारी सकाळी 11 वाजता झाल्टा फाटा येथील तपासणी नाक्यावर आली. नेहमीप्रमाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस बसमध्ये चढले. मात्र चालकाने गाडी बाजूला घेण्याचे निमित्त सांगितले व सर्व कर्मचाऱ्यांना खाली उतरवले. दरम्यान केंद्रप्रमुख कैलास जाधव हे बसमध्येच होते. चालकाने बस न थांबवता वेगाने पुढे नेली. बसचालक व इतरांनी जाधव यांना बेदम मारहाण केली. कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच केंद्रावरील बालाजी ढवळे आणि इतरांनी मोटर सायकलवर पाठलाग सुरु केला. मात्र फार काळ बसच्या मागे जाता आले नाही.

35 किमी अंतरावर नेऊन मारहाण

दरम्यान तपासणी पथकातील केंद्र प्रमुख कैलास जाधव यांना बसचालकाने तब्बल 35 किलोमीटर अंतरावर नेले. या परप्रांतीय ट्रॅव्हल्स कामगारांनी त्यांना बेदम मारहाणही केली. इकडे पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.

गुन्हा दाखल करण्यास 9 तास

दुपारी एक वाजेपासून पालिकेतील हे कोरोना योद्धे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची विनंती करीत होते. मात्र रात्री 9 वाजेपर्यंत पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला नव्हता. नंतर फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान, ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने देवळाई चौकातून एक कार पाठवली आणि या कारमधून जाधव यांना परत आणण्यात आले.

कोरोना योद्ध्यांमध्ये भीतीचे वातावरण

महापालिकेचे कर्मचारी शहरातील सात चेक पॉइंटवर कोरोना तपासणीसाठी तैनात असतात. शहरात आलेल्या बसची काटेकोरपणे तपासणी करण्यात येते. प्रवाशांकडील लसीकरणाचे प्रमाणपत्र, त्यांची तपासणी करण्यात येते. आपला जीव धोक्यात घालून हे कोरोना योद्धे कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, या करिता सेवा अर्पण करत आहेत. मात्र रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे चेकपॉइंटवर शहरात येणाऱ्या बसेसची तपासणी करणाऱ्या कोरोना योद्ध्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इतर बातम्या-

Aurangabad crime: आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या हाती, मोबाइल, जुगाराचे साहित्य अन् 89,300 रोख जप्त

Aurangabad crime: सातारा परिसरात दिवसाढवळ्या घरं फोडली, लोको पायलट आणि इंजिनिअरच्या घरात चोरी, सीसीटीव्हीत चोरटे कैद