FRAUD: भाबड्या शेतकऱ्यांना बोगस तीस-तीस योजनेची भुरळ, 300 कोटींचा गंडा, मास्टरमाइंड फरार

| Updated on: Oct 18, 2021 | 8:48 AM

औरंगाबाद:  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी (DMIC) जमिनी दिल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन (Bidkin Aurangabad) परिसरातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मावेजा मिळाला. या पैशावर डोळा ठेवून खासगी कंपन्यांनी या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. याच अमिषांना बळी पडून बिडकीन आणि परिसरातील शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. अनेक गावांतील भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनीही आपल्या पदरच्या […]

FRAUD: भाबड्या शेतकऱ्यांना बोगस तीस-तीस योजनेची भुरळ, 300 कोटींचा गंडा, मास्टरमाइंड फरार
30-30 नावाच्या बोगस गुंतवणूक योजनेत औरंगाबादमधील असंख्य शेतकऱ्यांची फसवणूक
Follow us on

औरंगाबाद:  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी (DMIC) जमिनी दिल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन (Bidkin Aurangabad) परिसरातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मावेजा मिळाला. या पैशावर डोळा ठेवून खासगी कंपन्यांनी या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. याच अमिषांना बळी पडून बिडकीन आणि परिसरातील शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. अनेक गावांतील भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनीही आपल्या पदरच्या एफडी मोडूनही यात गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने तीस-तीस योजनेतील (30-30 fraud scheme) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

30 गावांतून 700 कोटी

‘30-30’ नावाच्या ग्रुपनेही महिन्याला 5 ते 25 टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष दाखवून परिसरातील सुमारे 30 गावांतून 700 कोटी रुपये जमा केले. सलग चार वर्षे या ग्रुपने ठरल्यानुसार परतावा देत विश्वास संपादन केला. मात्र मागील सात महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदार त्रस्त झाले आहेत. व्याज तर सोडा, मुद्दलही गेल्यात जमा आहे. आजघडीला या भागातील जवळपास 300 कोटी रुपये ‘30-30’ ग्रुपमध्ये अडकलेले आहेत. ज्यांच्या ओळखीने पैसे गुंतवले ते मध्यस्थ आणि गुंतवणूकदारांमध्ये आता वाद सुरू झाले आहेत. या ग्रुपचा मास्टरमाइंड मात्र फरार आहे.

30-30 नंबरच्या गाड्यात येत होते लोक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील एक तरुण सध्या औरंगाबादेत बीड बायपास परिसरात राहतो. त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. 2016 मध्ये त्याने नातेवाइकांच्या मदतीने बिडकीन भागात शिरकाव केला. तो तरुण आणि त्याच्यासोबत येणाऱ्या मंडळींकडे ‘30-30’ नंबर असलेल्या महागड्या गाड्या होत्या. गाड्यांच्या नंबरवरून या ग्रुपचे नावच ‘30-30’ असे पडले. सोशल मीडियावरदेखील ग्रुप या नावाने पोस्ट करू लागले. एखादा नवीन गुंतवणूकदार त्यांच्या गळाला लागला की ‘30-30 ग्रुपमध्ये भाऊंचे स्वागत’, अशी पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केली जायची. मास्टरमाइंड तरुणाने महागड्या गाड्या, आलिशान हॉटेलमध्ये पार्ट्या, बैठका घेऊन सर्वप्रथम नातेवाइकांना भुरळ पाडली. सुरुवातीला या ग्रुपकडून गुंतवणूकदारांना परतावादेखील मिळाला, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यात गुंतवणूक केली.

जिल्हा परिषदेचा सदस्यही सहभागी

पैठण तालुक्यातील एका जि.प. सदस्याच्या माध्यमातून ग्रुप फोफावला. त्यानेही मोठा पैसा गुंतवल्याचे सांगितले जाते. अनेक गावांमध्ये हा सदस्य ग्रुपसोबत फिरला त्यामुळे लोकांचा विश्वास बसत गेला. आता गुंतवणूकदार त्यालाही पैशाबाबत विचारत आहेत. निलजगाव फाट्यावर काही गुंतवणूकदारांनी त्या सदस्याला घेरावदेखील घातला होता.

30-30 ग्रुप नोंदणीकृत नाही

‘30-30 ’ हा ग्रुप नोंदणीकृत नाही. पैसे घेतल्याच्या नोंदीही कुठे नाहीत. गुंतवणूकदारांनी फक्त नातेवाईक, मध्यस्थांमार्फत विश्वास ठेवत पैसा गुंतवला. बिडकीन भागातील अनेक व्हाइट कॉलर मंडळी या ग्रुपशी संबंधित असल्याने सामान्य लोकांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. त्यामुळे आता पैसे गुंतवल्याचे कुठलेही पुरावे गुंतवणूकदारांकडे नाहीत.

गुंतवणूकदार व मध्यस्थांमध्येच वाद

एका गुंतवणूकदाराने 13 लाख रुपये गुंतवले. सात महिन्यांपासून परतावा मिळत नसल्याने त्याने मध्यस्थाकडे तगादा लावला. वाद इतका टोकाला पोहोचला की मध्यस्थाने त्याला मारहाण केली. या प्रकरणी बिडकीन ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. पण गुन्हा दाखल करण्यापूर्वीच ‘30-30’चा उल्लेख कुठे केलास तर पैसे मिळणारच नाहीत’ अशी धमकी देण्यात आल्याने केवळ आर्थिक व्यवहारातून वादाचा फिर्यादीत उल्लेख केला. तक्रार केल्यास पैसे बुडतील या भीतीपोटी कुणी तक्रार देण्यास धजावत नाही, असे गुंतवणूकदार सांगतात.

कोणत्या गावांमध्ये झाली फसवणूक?

बिडकीन, गिरनेरा, गिरनेरा तांडा, चिंचोली, वरवंडी, कापूसवाडी, डोणगाव, बोकूडजळगाव, जांभळी, पाडळी, बंगला तांडा, पोरगाव, देवगड तांडा, कचनेर, निलजगाव, घारदोन, गाडीवाट इत्यादी गावांतील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

इतर बातम्या-

ज्वेलरच्या दुकानातून 20 तोळे सोन्यासह कामगार पसार, कोलकात्यातून दोघांना अटक

औरंगाबाद: सायबर गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळणार, छावणीत सायबर क्राइम विभाग सुरू

v