लाल दिव्याच्या गाडीतून येणार होता, पण अ‍ॅम्ब्युलन्समधून आला… अभिजीत दीपके समोर प्रथमेशच्या आईचा आक्रोश

MPSC अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रथमेश देशमुखने आर्थिक संकट आणि नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दीपके यांनी आज प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

लाल दिव्याच्या गाडीतून येणार होता, पण अ‍ॅम्ब्युलन्समधून आला... अभिजीत दीपके समोर प्रथमेशच्या आईचा आक्रोश
Abhijit Dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 1:25 PM

माझा मुलगा पुण्यात शिकायला गेला होता. त्याला अधिकारी व्हायचं होतं. प्रथमेश अधिकारी बनून लाल दिव्याच्या गाडीतून येणार होता. पण काल रात्री तो अ‍ॅम्ब्युलन्समधून आला, असा टाहोच प्रथमेश देशमुखच्या आईने अभिजीत दीपके यांच्यासमोर फोडला आहे. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या प्रथमेशने टोकाचं पाऊल उचलल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी आज धाराशिवमध्ये जाऊन प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी प्रथमेशच्या आईने हा काळीज चिरणारा सवाल करताच सर्वच हेलावले.

अभिजीत दीपके यांनी यानंतर मीडियाशी संवाद साधत प्रथमेशच्या हालाखीच्या परिस्थितीची माहिती दिली. प्रथमेशच्या घरची परिस्थिती चांगली नाहीये. त्याचे दाजी त्याला महिन्याला 8-10 हजार रुपये पाठवायचे. त्यातून तो पुण्यात शिक्षण घ्यायचा. पैसे अपुरे पडायचे म्हणून एकवेळचं जेवायचा. त्याची कौटुंबिक परिस्थिती चांगली नाही. त्याला वडील नाही. आई आणि पाच बहिणी आहेत. त्याची आई म्हणतेय, माझा मुलगा लाल दिव्याच्या गाडीत येणार होता. पण काल रात्री तो अ‍ॅम्ब्युलन्समध्ये आला. हे कशामुळे झालं? असा सवाल अभिजीत दीपके यांनी केला आहे.

दोन अडीच लाखासाठी जीवन संपवलं

प्रथमेश हा सिस्टिमला वैतागला होता. त्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली नसते. प्रथमेशच्या वाट्यालाही तेच आलं. त्याच्यावर दोन अडीच लाखाचं कर्ज होतं. मित्रांकडून त्याने पैसे उधार घेतले होते. ते फेडता येत नव्हते. इतरही विवंचना होत्या. त्यातच शेतीही वाहून गेली. मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतला. केवळ दोन अडीच लाखासाठी त्याला जीवन संपवावं लागलं, असा संताप दीपकेंनी व्यक्त केला.

अधिकारी बनायला आला, परत कसा जाणार?

ग्रामीण भागातील तरुणांनी पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं कसं? भाडं कसं भरायचं? लायब्ररीचे पैसे कुठून द्यायचे? कोचिंगचे पैसे कुठून द्यायचे? जेवणाचा खर्च कसा भागवायचा? ग्रामीण भागातील तरुणांना जे प्रश्न पडतात तेच त्याला पडले होते. म्हणून त्याने याच्या त्याच्याकडून पैसे उधार घेतले होते. कारण त्याला काही करून अधिकारी बनायचं होतं. गावातून अधिकारी होण्यासाठीच तो आला होता. परत कसा जाणार? एमपीएससी क्रॅक न करता गावाला गेला तर काय तोंड दाखवणार? हेच त्याला वाटलं असेल. त्यामुळे त्याने काटकसर केली. एकवेळचं जेवण करून राहिला. आजही त्याच्यासारखे हजारो तरुण पुण्यात असंच राहत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

व्यवस्थेने केलेला मर्डर

मराठवाडा आणि विदर्भातील तरुण मोठी स्वप्ने घेऊन पुण्या-मुंबईत अभ्यासासाठी येतात. एका खोलीत दहा-दहा विद्यार्थी राहून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, तांत्रिक अडचणी आणि पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होतं. तेच प्रथमेशच्या बाबतीत झालं. प्रथमेशने टोकाचा निर्णय घेतला नाही, तर हा व्यवस्थेने केलेला मर्डर आहे. अजून किती प्रथमेशचा जीव घेणार आहात? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

एका तरी मंत्र्याने फोन केला का?

एका तरी मंत्र्याने प्रथमेशच्या घरी फोन केला का? सरकारमधील कोणी विचारणा केली का? त्याच्या कुटुंबासोबत कोणी उभे राहिले का? प्रथमेशच्या आईला एकटं रडावं लागत आहे. तिच्यासोबत कोण उभं राहणार? तिला या संकटातून कोण बाहेर काढणार? असा सवालही त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us