औरंगाबाद मनपा निवडणूक: 38 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश, यंत्रणा लागली कामाला

| Updated on: Oct 06, 2021 | 3:15 PM

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला अनुभव अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीद्वारे 2011 मधील लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, असे यात सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद मनपा निवडणूक: 38 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश, यंत्रणा लागली कामाला
Follow us on

औरंगाबाद: शहरातील महापालिका निवडणुकीचा (Municipal corporation election) बिगुल अखेर वाजला असून निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवण्याच्या सूचना महापालिकेला मिळाल्या आहेत. मागील दीड वर्षापासून शहरातील सर्वच राजकीय पक्ष (Political parties) महापालिका निवडणुकीची आतूरतेने वाट पहात होते. अखेर आता निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाचे (State election commission) औरंगाबाद महापालिकेला (AMC) यासंदर्भात पत्र आले. त्यात शहरातील प्रभागांचा कच्चा आराखडा पालिकेने लवकरात लवकर आयोगाकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

एप्रिल-मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला अनुभव अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीद्वारे 2011 मधील लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, असे यात सांगण्यात आले आहे. शहरातील 115 वॉर्डांमध्ये एकूण 38 प्रभाग असतील. 3 वॉर्डांचे 37 तर आणखी एक प्रभाग 4 वॉर्डांचा असेल. ही तयारी सुरु झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

एप्रिल 2019 मध्येच पालिकेची मुदत संपली

औरंगाबाद महापालिकेची मुदत एप्रिल 2019 मध्येच संपली आहे. मात्र कोरोनाचा मोठ्या प्रमाणवार प्रादुर्भाव झाल्याने निवडणूक लांबली होती. तसेच नवीन आरक्षण सोडतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असल्यानेही निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. मात्र विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार मात्र निवडणुकीचा मार्ग कधी मोकळा होतो, याकडे लक्ष लावून बसले होते. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील 21 महापालिकांच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. यात औरंगाबादचाही समावेश आहे. महापालिकेने यापूर्वी तयार केलेली एक सदस्यीय वॉर्ड रचना रद्द करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. आता नव्या प्रभाग रचनेसाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे.

आयोगाने महापालिकेला कोणत्या सूचना दिल्या?

– नव्याने प्रभागरचना करण्यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार प्रगणक गटनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या, नकाशे उपलब्ध करून घ्यावेत
– प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करताना अनुभवी अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आवश्यकतेनुसार घ्यावेत
– प्रभागाची लोकसंख्या 10 टक्के जास्त किंवा 10 टक्के कमी ठेवता येईल.
– मोठे रस्ते, गल्ली, नद्या, नाले, डोंगर, उड्डाणपूल, नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊनच संबंधित प्रभागाची हद्द निश्चित करावी.
– प्रभागातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

इतर बातम्या-

Aurangabad Alert : नगरमध्ये एकूण 68 गावांत लॉकडाऊन,औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी

Aurangabad: महापालिका उभारणार सात चार्जिंग स्टेशन अन् ई-कारही खरेदी करणार, नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पालिकेची तयारी