उद्धव ठाकरेंनी शड्डू ठोकला, पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर, घडामोडींना वेग
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे.
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा (Uddhav Thackeray Aurangabad Visit) आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला उद्या दुपारी बारा वाजेपासून सुरुवात होणार आहे. ऐन दिवाळीत उद्धव ठाकरे दौऱ्यावर निघाले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. राज्यात सत्ता परिवर्तन झालं, त्याआधी उद्धव ठाकरे यांना आजारपणाशी झुंजावं लागलं. आजारपण आणि पक्षातील संघर्ष एका पाठोपाठ आल्याने ठाकरेंपुढील आव्हान वाढलं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी माघार घेतलेली नाही. ते शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयत. आता तर त्यांनी थेट औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाऊन ओला दुष्काळाची पाहणी करण्याचं ठरवलं आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यातून राजकारणापलीकडे शेतकऱ्यांना काही फायदा होईल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.
उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाची पाहणी करुन सरकारकडे नेमक्या काही ठोस मागण्या करणार आहेत का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बळीराजाची विचारपूस करणार आहेत. या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधतात का? ते राज्य सरकारवर काही टीका करतात की शेतकऱ्यांसाठी ठोस मागणी करतात? याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.
राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ माजवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने थैमान माजवल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीच्या नुकसानीचे अनेक फोटो सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहेत. या भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांना सध्या राज्य सरकारकडे मदतीची आशा आहे. राज्यभरात सध्या दिवाळी सणाचा उत्साह आहे. पण राज्याचा अन्नदाता शेतकरी अतिशय वाईट आर्थिक स्थितीतून जातोय. या कठीण परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांना नेमकी काय मदत करतं आणि कुठपर्यंत करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार?
दरम्यान, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मदत मिळवून देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या संवेदनशील स्वभावाची राज्याला जाणीव आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यातून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून लवकर साहाय्य मिळण्यास मदत होईल, अशी आशा शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात उद्धव ठाकरे खरंच यशस्वी ठरले तर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला चांगलं महत्त्व प्राप्त होऊ शकतं.