खाम नदीवरील पूल बांधण्यासाठी पंधरा दिवसात 1.10 कोटीचा निधी देणार, राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

| Updated on: Sep 10, 2021 | 6:52 PM

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळातील पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.

खाम नदीवरील पूल बांधण्यासाठी पंधरा दिवसात 1.10 कोटीचा निधी देणार, राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा
खाम नदीलगत पाहणी करताना महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार
Follow us on

औरंगाबाद: मंगळवारी 07 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद (Heavy Rainfall in Aurangabad) शहरातील अनेक भागात पाणी शिरले. या दिवशी एवढा विक्रमी पाऊस पडला की खाम नदी तुंबून तिचे पाणी सखल भागात शिरले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. येथील नुकसानीची पाहणी आज राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार (state revenue minister Abdul Sattar) यांनी केली. खाम नदीवरील सध्याचा पूल पाडून नवीन उंच पूल बांधण्याकरिता तसेच नदीपात्र आणखी खोल करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी पंधरा दिवसात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

श्रेयनगर, नूर कॉलनी, जलाल कॉलनीलाही भेट

दरम्यान शुक्रवारच्या पाहणी दोऱ्यात मंत्र्यांनी श्रेयनगर, नूर कॉलनी आणि जलाल कॉलनी या भागातही पाहणी केली. यावेळी विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. श्रेयनगर भागातील शलाका अपार्टमेंट लगत नाल्याचे पाणी मंगळवारी झालेल्या पावसामुळे घरात शिरले होता. या भागाची देखील पाहणी अब्दुल सत्तार यांनी केली. याठिकाणी अस्तित्वात असलेला जुना पूल पाईप क्लवर्टचा असून तो पाडून त्याची उंची वाढवून पाईप ऐवजी स्लॅब टाकून नवीन पूल बांधण्यासाठी, नाल्याची संरक्षण भिंत बांधण्यासाठी आणि नाल्याची खोली वाढविण्यासाठी सत्तार यांनी ₹1.10 कोटी ची निधी 15 दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

नवीन पूल बांधण्याचा प्लॅन तयार करण्याच्या सूचना

खाम नदीवरील नवीन पूल बांधण्याचे आणि नदी खोल करणे संबंधीचा प्लॅन तात्काळ तयार करून देण्याबाबत अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी नूर कॉलनीसाठी जेवढा शक्य होईल तो निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे, माजी नगरसेवक रेणूकदास वैद्य, माजी नगरसेविका शिल्पा वाडकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, रवींद्र निकम, वॉर्ड अधिकारी एस डी जरारे, वॉर्ड अभियंता डी के परदेशी व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या- आ. सतीश चव्हाण

दरम्यान, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळातील पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 10 सप्टेंबरच्या या दौऱ्यात सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी तसेच यामुळे विविध ठिकाणी फुटलेले कोल्हापूरी बंधारे, खचलेले पूल, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आदी संदर्भात दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही

नुकत्याच झालेल्या पावसाचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी पिके पाण्याबरोबर वाहून गेली. नदी-नाल्यांच्या काठावरील जमिनी खरवडून निघाल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना सांगितले. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिले.

इतर बातम्या- 

Aurangabad Alert: मिठाई खरेदी करताना सावधान, ट्रेवर Best Before Date लिहिलंय का पहा

लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी, औरंगाबादेत बालगणेशाच्या मोहक मूर्तींची भूरळ