Sanjay Shirsat : येत्या 15 दिवसात राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप; संजय शिरसाट यांचं भाकीत काय?

| Updated on: Oct 23, 2023 | 2:11 PM

कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू नये या मताचे आम्ही आहोत. ज्यांना आरक्षण द्यायचं आहे ते टिकलं पाहिजे. कायमस्वरुपी आरक्षण द्यायचं आहे. सगळ्यांना त्यांच्या ताटातलं मिळालं पाहिजे.

Sanjay Shirsat : येत्या 15 दिवसात राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप; संजय शिरसाट यांचं भाकीत काय?
sanjay shirsat
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 23 ऑक्टोबर 2023 : दिवाळीला अवकाश असून त्या आधीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत. सर्वच पक्षातील नेते मोठ्या राजकीय भूकंपाचं भाकीत आतापासूनच करत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाचे 10-15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, अजितदादा गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात असून त्यांची वरिष्ठांशी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे हे दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं भाकीत करून खळबळ उडवून दिली आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेतच दिले आहेत. ठाकरे गटातील लोकआमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या पक्षाबाबतच्या काहीही वावड्या उठवल्या जात आहेत. आमच्या पक्षाचा कोणताही खासदार आणि आमदार पक्षाच्या चिन्हा शिवाय कोणत्याही वेगळ्या चिन्हावर लढणार नाही. उलट त्यांच्या पक्षातून जे येणार आहेत ते लवकरच आमच्या पक्षात येतील. आमच्याच चिन्हावर लढतील. याची प्रचिती तुम्हाला येत्या 15 दिवसात येईलच, असं भाकीतच संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हे मात्र खूर्चीसाठी…

शिवसेनेचा मेळावा उद्या जल्लोषात होणार आहे. विचाराशी बांधिल असलेल्या शिवसेनेचा संगम उद्या आझाद मैदानावर पाहायला मिळणार आहे. टीका करणाऱ्यांनी शिवसेना लोकांच्या दरात उभी केली. राष्ट्रपती, पंतप्रधान हे सगळे मातोश्रीवर येऊन नतमस्तक होत होते. काही लोक खूर्चीच्या स्वार्थासाठी सिल्व्हर ओकच्या सोफ्यावर हात जोडून बसत आहेत. शिवसेना प्रमुख सांगायचे सत्ता माझ्यासाठी जन्माला आली पाहिजे. यांनी मात्र हा विचारच बाजूला सारला, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

आरक्षण मिळेलच

मराठा समाजाचा आंदोलन वेगळ्या पातळीवर आले आहे. आरक्षण मिळावं ही भावना योग्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला. शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळतात. नेत्यांना गाव बंदी घालणे आंदोलनाचा भाग असला तरी यावर एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेलच, यात काहीच शंका नाही, असंही ते म्हणाले.

म्हणून जाहिरात दिली

छापून आलेल्या जाहिरातीतून प्रत्येक समाजासाठी सरकार काय करतं हे दाखवत आहे. मागच्या सरकारमध्ये हे काम होत नव्हते. शिंदे सरकार त्यात भरीव वाढ करून मदत करण्याचा प्रयत्न आहेत. वंचित घटकाला वर आणण्याचा प्रयत्न आहे. सरकार प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे आहे हे दाखवून देण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मोदींकडे जाऊ

संजय राऊत यांच्यासारख्या बकवास माणसाने बोलून उपयोग नाही. त्यांचं सरकार असताना त्यांनी अडीच वर्षात काय केलं ते त्यांनी सांगावं. आरक्षणाच्या विषयावर एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदींकडे जातील आणि सर्व मंत्रिमंडळ देखील जाईल, असंही ते म्हणाले.

तुम्ही काय केलं?

सुप्रिया सुळे, शरद पवार, संजय राऊत वारंवार बोलतात. मात्र तुम्ही काय केलं हे कधी सांगाल का? तुम्ही दिलेले आरक्षण कसं कमकुवत दिलं? समाजाची सहानुभूती घेण्याच्या प्रयत्न करून नका. खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा काम एकनाथ शिंदे करत आहेत.