मराठ्यांप्रमाणे आम्हालाही आरक्षण द्या, बंजारा समाजाचा थेट मुंबईत मोठा एल्गार

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी कन्नड ते मुंबई पर्यंत ११ दिवसांचा पायी प्रवास सचिन चव्हाण आणि देवचंद राठोड यांनी केला. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी करत त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

मराठ्यांप्रमाणे आम्हालाही आरक्षण द्या, बंजारा समाजाचा थेट मुंबईत मोठा एल्गार
| Updated on: Sep 21, 2025 | 4:49 PM

बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावं, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याच मागणीसाठी संभाजीनगरच्या एका प्राध्यापकाने आणि एका अभियंत्याने कन्नड ते मुंबई अशी तब्बल 11 दिवसांची पायी वारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन चव्हाण (प्राध्यापक) आणि देवचंद राठोड (अभियंता) अशी या दोन तरुणांची नावे आहे. गेल्या ११ सप्टेंबरला ते कन्नडहून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर येत्या 20 सप्टेंबर रोजी ते मुंबईत दाखल झाले.

हे दोन तरुण कन्नड ते मुंबई असा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून या दोन्ही तरुणांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला मराठा समाजाप्रमाणेच एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर आज त्यांनी विश्रांती घेतली. यानंतर आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे.

 मोठा एल्गार मोर्चा

या पायी वारीसोबतच, कन्नडमध्ये देखील बंजारा समाजाच्या मागणीसाठी मोठा एल्गार मोर्चा काढण्यात आला. सोमवारी (19 सप्टेंबर) तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजाने हा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात हजारो समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेषतः महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून पारंपरिक नृत्ये सादर केली, ज्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. तरुणांनीही संत सेवालाल महाराजांचा पांढरा ध्वज हातात घेऊन घोषणाबाजी करत सहभाग घेतला.

आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढू

शहरातील गिरणी ग्राउंड येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर येऊन सभेत रूपांतरित झाला. यावेळी महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, ऋषिकेश चव्हाण, वीरा राठोड आणि आकांक्षा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी शासनाला इशारा देत म्हटले की, “महिनाभरात मराठा समाजाप्रमाणेच बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू केले नाही, तर मुंबईतील आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढला जाईल.”

यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी समाजाच्या महंतांकडून आणि युवतींकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंजारा समाजाच्या या आंदोलनामुळे आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us