
बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साक्षी कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती केएसके महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने १४ मार्च रोजी मामाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून तिचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता यासंदर्भात साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“साहेब, मी तुमची लाडकी बहीण.. तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि राज्यातील अस्वस्थ झालेल्या बहिणींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हासारख्या अगणित बहिणींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे. आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात. आज आम्हाला तुमची कमतरता भासते.
माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. साहेब आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहिती आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढी शिक्षा होणे अपेक्षित आहे”, असे साक्षीच्या आईने दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
साक्षीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आज २० एप्रिल रोजी मुलीचे लग्न होणार होतं, पण त्याआधीच छेडछाडीला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली. अभिषेक कदम आणि १० ते १२ मुलांची एक टोळी आहे. ही टोळी मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढतात अन् ब्लॅकमेल करतात. हे एक प्रकारे रॅकेट आहे. यामध्ये दोन मुलींचाही समावेश आहे. अभिषेक कदम याच्यावर मकोका लावावा अन् कायमचा जेलमध्ये टाकावा, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली.
यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय दबावाला पोलिसांनी बळी पडू नये. बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये. पोलिसांनी कडक कारवाई करावी. मुलींची छेडछाड असेल तर पोलिासांनी कठोर कारवाई करावी, असे अंबादास दानवे यांनी म्हटले