जन्मदात्या वडिलांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या आमदारावर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 12, 2023 | 5:00 PM

बीडच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदाराच्या वडिलांनी आपल्याला धक्काबुक्की आणि घरातून बाहेर काढल्याचा आरोप करत आपल्या पोटच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

जन्मदात्या वडिलांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या आमदारावर गुन्हा दाखल
Follow us on

बीड : बीडच्या राजकारणातील (Beed Politics) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या दुसऱ्या मुलाविरोधातही फिर्याद दिली आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांचे भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हाची नोंद आहे. क्षीरसागर बंधूंवर कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. कौटुंबिक कारणावरून संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघा भावांनी वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढण्याचा प्रकार घडला आणि या वरून स्वतः रवींद्र क्षीरसागरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर बीडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

क्षीरसागर काका-पुतण्यांचा वाद सर्वश्रूत

क्षीरसागर कुटुंबातून सातत्याने वादाच्या बातम्या समोर येत असतात. बीडमधील क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्याचा वाद सर्वश्रूत आहे. ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर यांचे काका आहेत. जयदत्त हे विधीमंडळात होते तर त्यांचे बंधू रवींद्र क्षीरसागर हे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच कारखान्यातील राजकारणात सक्रीय असत. पुढे रवींद्र क्षीरसागर यांचे पुत्र संदीप क्षीरसागर हे देखील राजकारणात आले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकीय कारकीर्द सुरु केली. पण त्यांना आमदार व्हायचं होतं. त्यातून काही वर्षापूर्वी जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या दोन्ही काका-पुतणे यांच्यात वाद झाला. नंतर क्षीरसागर कुटुंबात वाद सातत्याने सुरुच आहेत.

बीडच्या राजकारणात संपूर्ण क्षीरसागर कुटुंबाचं वर्चस्व आहे. संदीप क्षीरसागर यांच्या आजी दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचं नाव आजही बीडच्या राजकारणात आदराने घेतलं जातं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यी तीनही पुत्रांनी वेगवेगळ्या माध्यमातून राजकारणात आपलं वर्चस्व काय ठेवलं. पण गेल्या काही वर्षांमध्ये बीडच्या राजकारणात राजकारण आणि संपत्तीवरुन क्षीरसागर कुटुंबात वाद निर्माण झाला.  त्यानंतर वारंवार क्षीरसागर कुटुंबातील वादाच्या बातम्या समोर येत असतात.