
काल बीड जिल्ह्यातील गेवराईत लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर आज लक्ष्मण हाके यांनी आमदार पंडित आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना डिवचले. त्यांनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. ओबीसींनी आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान पोलिसांनी सुमोटो करत लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. काय म्हणाले हाके?
जरांगेंवर गुन्हा दाखल का नाही?
आम्हाला अटक करा, आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले. पण बीड पोलिसांनी आमच्यावर गुन्हा नोंदवताना जी तत्परता दाखवली ती मनोज जरांगे यांच्याविरुद्ध का दाखवत नाहीत, असा सवाल हाकेंनी पोलिसांना केला. पाच मिनिटांअगोदर नोटीस देण्यात आली आणि पोलिसांनी लागलीच आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप हाकेंनी केला.
साडेअठ्ठावीस किलोचं भूत मानगुटीवर
जरांगे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहेत. हे साडेअठ्ठावीस किलोचं भूत राज्याच्या मानगुटीवर बसलं आहे. घरं, मालमत्ता जाळल्या जात आहेत. हल्ले होत आहेत. सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत आहे. पण गृहविभागानं, पोलिसांनी त्याला एकदाही अटक केल्याचं माझ्या ऐकण्यात नाही, असं हाके म्हणाले. जरांगे सारख्या खुळचट माणसासाठी एक आणि कायदा पाळणाऱ्या आमच्यासारख्यांना वेगळा न्याय का, कायद्यात असा दुजाभाव का, असा सवाल हाकेंनी केला. सरकार उलथवायला जरांगेंकडे किती आमदार आहेत, असा सवाल ही हाकेंनी केला.
कुठं तुझी हलगी वाजवतोय?
सरकार उलथून टाकण्याच्या जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली. 14 टक्के कुठं आहेत असं म्हणतं, कुठं तुझी हलगी वाजवतोय, आमच्याकडे नगरा आहे नगरा असा इशारा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. नगारा ज्यादिवशी वाजेल ना, त्या दिवशी आसमंत उजळून निघेल. आम्हाला जास्त छळण्याचा, छेडण्याचा प्रयत्न करू नका, असे हाके म्हणाले.
तर गेवराईतील राड्यानंतर त्यांनी स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांनी गोदापात्राची चाळण केली आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि वाळू माफियांनी वाळू चोरल्याचा आरोप त्यांनी केला.आमदार हे वाळूसम्राट असल्याचा आरोप त्यांनी केला. विजयसिंह पंडित यांना त्यांनी डिवचले. त्यांना जर जरांगे यांची इतकी कड असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ओबीसी कधी रस्त्यावर उतरणार? असा सवालही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.