बोडीतील म्हशी काढायला गेला, पण जिवंत परतलाच नाही! दिगंबरच्या मृत्यूनं पत्नी-मुलांवरील छत्र हरपलं

शोधाशोध सुरु केली असता दिगंबर बावनकुळे यांचा मृतदेह बोडीच्या पाण्यात आढळून आला.

बोडीतील म्हशी काढायला गेला, पण जिवंत परतलाच नाही! दिगंबरच्या मृत्यूनं पत्नी-मुलांवरील छत्र हरपलं
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 09, 2022 | 9:40 AM

भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. म्हशी बोडीतून काढत असताना एक इसम पाय घसरुन पडला आणि बोडीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी हा व्यक्ती बोडीत पडल्यानंतर आजूबाजूला कुणीच नसल्यानं पाण्यात बुडत (Drown Death) असल्याची कुणालाच कल्पना येऊ शकली नाही. अखेर बराच वेळ हा इसम घरी का परतला नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी या इसमाचा मृतदेह बोडीच्या पाण्यात आढळून आला. या इसमाचा मृतदेह पाहून गावातील लोकांसह घरातल्यांना मोठा धक्काच बसला. याप्रकरणी पोलिसांनाही (Bhandara Police) कळवण्यात आलं असून भंडारा जिल्ह्यातील पालांदूर पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रात्री अंधारात हा इसम म्हशींना बाहेर काढत होता. त्यावेळी ही दुःखद घडना घडली. या दुर्दैवी घटने मृत्यू झालेल्या इसमाचं नाव दिगंबर गोमा बावनकुळे असं आहे. ते 49 वर्षांचे होतं.

नेमकी कुठे घडली घटना?

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुमारीड तुप इथं दिगंबर सोमा बानवकुळे हे राहत होते. रात्री उशिरा ते आपल्या म्हशींना बोडीतून बाहेर काढण्यासाठी गेले होते. अंधार पडत असल्यानं दिगंबर बोडीजवळ गेले असता त्यांचा तोल गेला. पाय घसरुन दिगंबर बोडीच्या पाण्यात पडले. यावेळी बोडीच्या पाण्यात ते बुडाले. बराच वेळ घरी न आल्यामुळे दिगंबर यांना आरडाओरडा करुन हाक देण्यात आली. पण काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर घरासह शेजारील लोकही शोधाशोध करु लागले.

कर्ता पुरुष गमावल्यानं हळहळ

शोधाशोध सुरु केली असता दिगंबर बावनकुळे यांचा मृतदेह बोडीच्या पाण्यात आढळून आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. बानवकुळे यांचा मृतदेह अखेर गावातील लोकांनी बाहेर काढला. पोलिसांतही या घटनेची नोंद करण्यात आली. बावनकुळे हे पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह राहत होते. पण घरातील कर्ता पुरुष गमावल्यानं आता बावनकुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सध्या पालांदूर पोलिसांकडून या घटनेप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

10 दिवसांतली दुसरी घटना

दरम्यान, दहा दिवसांपूर्वीच जळगावातही एका 17 वर्षांच्या तरुणाचाही असाच मृत्यू झाला होता. चरायला गेलेली जनावरं परत आणण्यासाठी हा तरुण गेला होता. नदीत जनावरं उतरली होती. नदीच्या काठावरुन या तरुणानं जनावरांना आधी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही केल्या जनावरं बाहेर येईना म्हणून अखेर तरुण नदीत उतरला, पण पाय घसरुन तो नदीत कोसळला. जळगावच्या जामोज येथील मडाखेडमध्ये सुपेश खंडराव या 17 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनंतर आता भंडाऱ्यातील दिगंबर बानवकुळे यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जातेय.