भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीतकांड, पीडितांची आर्त हाक वर्षभरानंतर तरी ऐकली जाणार का?

| Updated on: Jan 09, 2022 | 7:06 PM

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अतिदक्षता विभागात आग लागून अकरा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्ष उलटून देखील अद्यापही दोषींवर ठोस कारवाई झालेली नाही.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीतकांड, पीडितांची आर्त हाक वर्षभरानंतर तरी ऐकली जाणार का?
Follow us on

भंडारा :  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अतिदक्षता विभागात आग लागून अकरा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्ष उलटून देखील अद्यापही दोषींवर ठोस कारवाई झालेली नाही. घटना घडली तेव्हा सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी कारवाईचे अश्वासन दिले होते, तर विरोधकांनी देखील मागणी लावून धरली होती मात्र तरी देखील दोषींवर कारवाई झाली नाही. दरम्यान आता तरी दोषींवर कारवाई करा अशी मागणी या घटनेतील पीडित मातांनी केली आहे.

घटनेत 11 बालकांचा मृत्यू

9 जानेवारी 2021 च्या पहाटे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भिषण आग लागली. या आगीमध्ये 10 बालकांचा होरपळून मृत्यू झाला तर एका बालकाचा उपचारादरम्यान नगपूरमध्ये मृत्यू  झाला. अशा प्रकारे या घटनेत अकरा बालके दगावली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत दोषींवर कडाक कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार तातडीने चौकशी समितीचे गठण करण्यात आले होते. चौकशी समितीच्या अहवालानुसार सात डॉक्टर व नर्सेसवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 39 दिवसांनंतर दोन कंत्राटी परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र जे दोषी डॉक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हाच दाखल झाला नसल्याचा आरोप आता या पीडित मातांकडून करण्यात येत आहे. खरे आरोपी सोडून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बळी देण्यात आल्याचा आरोप या मातांनी केला आहे.

काय आहे पीडित कुटुंबीयांचा आरोप?

भंडारा रुग्णालय जळीत प्रकरणात ज्या दोन नर्सवर कारवाई करण्यात आली त्या कर्तव्यावर असताना सुद्धा आउट बॉर्न आणि इन बॉर्न या ठिकाणी उपस्थित नव्हत्या, त्यामुळे या नर्सला आग लागल्याची माहिती लगेच मिळाली नाही, असे सिसिटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  सध्या संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात दोन बाळांच्या मागे एक नर्स असायला पाहिजे. मात्र त्याठिकाणी 17 बाळांच्या मागे केवळ दोनच नर्स कर्तव्यावर होत्या. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता खऱ्या दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी संबंधित कुटुंबीयांकडून होत आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

दरम्यान या जळीत कांडानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार आता या रुग्णालयात फायर सिस्टम व नवे इलेक्ट्रिक साधने बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या घटनेनंतर देखील अनेक रुग्णालयात या प्रकारचे अपघात घडले. या घटनांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

भंडाऱ्याला भेट दिलेले आजी-माजी मंत्री, नेते

ही घटना घडल्यानंत अनेक आजी माजी मंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट दिली. दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. यानंतर दोन कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला मात्र, तरी देखील अद्यापही खरे आरोपी मोकाटच असल्याचा आरोप या पिडीत मातांनी केला आहे. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाला  1) माजी मंत्री चंद्रशेखर बावकुळे, 2) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, 3) आरोग्य मंत्री राजेश टोपे ,4) कँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले, 5)भुकंप पुनर्वसन मंत्री-विजय वडेट्टीवार, 6)भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम, 7) माजी गृहमंत्री अनिल देशमुख 8) मंत्री अमित देशमुख, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी भेट दिली होती. एवढ्या सगळ्या नेत्यांनी भेट देऊन देखील अद्यापही या माता न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

संबंधित बातम्या 

Narendra Modi : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक, देशातील स्थितीवर मंथन

‘मविआमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही’, शिवसेना आमदाराची खंत