मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्याचं रहस्य काय? प्रफुल्ल पटेल म्हणाले…

| Updated on: Oct 25, 2023 | 6:54 PM

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्याचं रहस्य काय? प्रफुल्ल पटेल म्हणाले...
Follow us on

भंडारा | 25 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शिंदे-फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकारील दबाव वाढला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. याबाबतच्या चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिंदे-फडणवीस यांच्या दौऱ्यावर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

“मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही. उलट सगळे पक्ष, सत्ताधारी आणि विरोधक म्हणतात की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. तो विषय हायकोर्टात टिकला होता. मात्र, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हा विषय परत रद्द करण्यात आला. विषय एवढाच आहे की, यातून न्यायिक मार्ग कसा काढायचा, ही महत्त्वाची बाब आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

“मुद्दा हा नाही की, उद्या द्यायचं, उद्या देवू शकतो, पण मुद्दा न्यायपालिकेत नाही टिकला तर? परत कोणत्या समाजाची फसवणूक होता कामा नये. ही महत्वाची बाब आहे. त्यामुळे साहजिकच आहे या विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे गेले असतील. काही मार्ग काढण्यासाठी गेले असावेत”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

“दुसरी गोष्ट म्हणजे काही राजकीय चर्चा किंवा बऱ्याच गोष्टी तीन पक्षांच्या पेंडींग आहेत. मंत्रिमंडळ विस्तार पेंडिंग आहे. अशा काही बाबतीत चर्चा करण्यासाठी शिंदेड-फडणवीस अमित शाह यांना भेटायला गेले असावेत”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा प्रलंबित विस्तार लवकरच होणार असल्याचे संकते मिळत आहेत.

प्रफुल्ल पटेल यांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेबाबत प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. “आपला देश स्वतंत्र झाल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तो त्यांचा विषय असून ते त्यांच्या हिशोबाने बोलत असतील. आपण ऐकून घ्यावं, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

प्रफुल्ल पटेल रोहित पवारांवर म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. याबाबत खासदार प्रफुल पटेल यांना विचारले असता त्यांनी “महाराष्ट्र किती मोठा आहे. महाराष्ट्राची व्याप किती मोठा आहे. महाराष्ट्रातील समस्या काय-काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.