‘सर्व म्हणायचे होशील तू नापास, पण झालो मी बारावी पास’, बॅनरची चर्चा भंडारा जिल्ह्यात

Bhandara Tea Seller Boy HSC Exam : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. 'सर्व म्हणायचे होशील तू नापास, पण झालो मी बारावी पास', या बॅनरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याची पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली आहे.

सर्व म्हणायचे होशील तू नापास, पण झालो मी बारावी पास, बॅनरची चर्चा भंडारा जिल्ह्यात
भावाच्या, पोस्टरची एकच चर्चा
| Edited By: | Updated on: May 26, 2024 | 8:52 AM

इयत्ता बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. आयुष्यातील या महत्वपूर्ण परीक्षेवरुन विद्यार्थ्यांचे भविष्य ठरत असते. गेल्या काही वर्षांमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा आता स्पर्धेत बदलली आहे. लाखो स्पर्धक या जीवघेण्या स्पर्धेत उर फुटेपर्यंत धावतात. पालकांना पण आपल्या मुलाने ९० किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मिळावेत असे वाटते. आजकाल बारावीमध्ये तब्बल ९० ते ९५ टक्क्यांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौडकौतुक आपण नेहमी पाहतो. पण प्रत्येक विद्यार्थ्याला हा टप्पा गाठता येतोच असे नाही. ज्याच्याकडून काहीच अपेक्षा नसते, त्याने जर यश खेचून आणले, तर मग त्याचा जल्लोष काही औरच असतो.

बॅनरची रंगली चर्चा  

‘सर्व म्हणायचे होशील तू नापास, पण झालो मी बारावी पास’, या बॅनरची सध्या भंडारा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. लाखांदूर शहरातील पंकज नरेश जेंगठे या विद्यार्थ्याने 55 टक्के गुण घेतले. पंकज या विद्यार्थ्यासाठी एक अर्थाने विशेष आहे कारण त्याच्या आजूबाजूचे शेजारी पाजारी मित्रमंडळी “अबे पंक्या तू नापास होशील, तू हेच धंदे करशील असे म्हणून त्याला हिणवत होते” मात्र पंकज या पठ्याने घरच्या परिस्थितीवर मात करत बारावी पास झाला आणि त्याच्या कौतुकाचे बॅनर आता लाखांदूर शहरात झळकू लागले आहे.

हालाकीच्या परिस्थितीशी सामना

पंकज हा भूमिहीन कुटुंबातील आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. आई-वडिलांच्या मिळकतीतून संसाराचा गाडा हाकता येत नसल्यामुळे वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच तो मिळेल ते काम करू लागला. सुरुवातीला घरालगतच्या एका किराणा दुकानात काम करू केले. नंतर नाश्ता सेंटरमध्ये कामास सुरुवात केली. आता तो शहरातील शिवाजी चौकातील चहा व पानटपरीमध्ये काम करत आहे. स्वतःच्या मिळकतीतून शिक्षणाचा खर्च व आईवडिलांना हातभार लावत आहे. बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर व पेपरच्या दिवशी देखील पंकज कामावर असल्यामुळे सारेच त्याला हिणवत होते. मात्र आज पंकज याने 55% गुण घेतले. एका अर्थाने परिस्थितीवर मात केली. त्यामुळे त्याचे कौतुक तर होणारच