रोवणीसाठी मजूर महिला शेतात गेल्या, महिलांसोबत घडली दुर्दैवी घटना 

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कारण विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.

रोवणीसाठी मजूर महिला शेतात गेल्या, महिलांसोबत घडली दुर्दैवी घटना 
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 21, 2023 | 6:45 PM

भंडारा : विदर्भात येणारे पाच दिवस जोरदार पावसाचे आहेत. येत्या 24 तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलं. विदर्भातील इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पाच दिवसाच्या नंतर पाऊस थोडा कमी होईल. मात्र पावसाची संततधार सुरू राहणार आहे. विदर्भात मान्सून उशिरा दाखल झाल्याने पावसाचा बॅकलॉग निर्माण झाला होता तो भरून निघाला आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कारण विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतात रोवणीची कामे सुरू आहेत.

दोन महिलांचा मृत्यू, तीन जखमी

भातपिकाच्या लागवडीची काम जोरात सुरू आहेत. विदर्भात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसात अचानक शेतात वीज कोसळली. यात दोन महिलांचा मृत्यू तर, तीन महिला गंभीर जखमी झाल्यात. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या निलज खुर्द या गावाच्या शेतशिवारात घडली.

 

अशी आहेत मृतकांची नावं

वच्छला बावनथळे (वय 50 वर्षे), लता गाढवे (वय 50 वर्षे) असं दोन मृतक महिला मजुरांचं नावं आहेत. सुलोचना सिंगनजुडे (वय 55 वर्षे), बेबीताई सयाम (वय 55 वर्षे), निर्मला खोब्रागडे (वय 50 वर्षे) गंभीर जखमी महिलांची नावं आहेत. सध्या गंभीर जखमींवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मृतक आणि जखमी नवेझरीच्या रहिवासी

या सर्व महिला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नवेझरी येथील आहेत. त्या भात पिकाच्या लागवडीसाठी निलज खुर्द येथील सूर्यप्रकाश बोंद्रे यांच्या शेतात महिला मजूर म्हणून आल्या होत्या. रोवणीच्या कामासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गरज असते. आता रोवणीसाठी महिलांची मजुरी जास्त आहे. त्यामुळे बहुतेक महिला घराबाहेर पडतात. पण, वीज पडून मृत्यू झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नरेंद्रनगर पुलाखाली साचलं पाणी

नागपुरात झालेल्या जोरदार पावसामुळे नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचलं. एका बाजूची वाहतूक पाणी साचल्यामुळे बंद झाली. नागरिकांना एकाच भागातून वाहतूक करावी लागत आहे. मोठा पाऊस आला की या पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. मात्र याकडे महापालिकेचे नेहमीच दुर्लक्ष होते. दुर्घटना घडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी एका बाजूची वाहतूक बंद केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us