शिवसेनेसाठी सर्वच केले, पण पदे देताना विचार झाला नाही…भास्कर जाधव यांची सरळ उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी

पक्ष फुटला तेव्हा गटनेता म्हणून माझाच दावा होता. पण त्यावेळी मला गटनेते केले नाही. तेव्हा मी काही बोललो नाही. त्यानंतर बैठकीत भाजपला विरोध करणारा मी एकटा होतो. २० तारखेला मतदान झाले. मी २१ तारखेला येथेच होतो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फोन आला.

शिवसेनेसाठी सर्वच केले, पण पदे देताना विचार झाला नाही...भास्कर जाधव यांची सरळ उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी
Jitendra Zavar | Updated on: Mar 10, 2024 | 2:50 PM

चिपळून, रत्नागिरी, | दि. 10 मार्च 2024 : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. पक्षासाठी आपण सर्व काही केले, पण पक्षाने पदे देताना आपला विचार केला नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. एकाप्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. भास्कर जाधव म्हणाले, मी लढतो, ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी. परंतु मला मंत्रीपद मिळाले नाही. गटनेतेपद मिळाले नाही. यापुढेही मिळणार नाही, हे माहीत आहे. उद्धव साहेबांना मी म्हणालो आहे की, तुमच्या मनात माझ्याबद्दल जे असेल ते असू द्या. पण मी २०२४ विधानसभा निवडणूक होईपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही, हा शब्द देत आहे.

पदे देताना विचार होणार नाही

भास्कार जाधव म्हणाले की, दोन वेळा पक्ष सोडताना मी सर्वांना विश्वास घेतले. कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर पक्ष प्रवेश केला. रात्रीतून पक्ष बदलला नाही. उद्या उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल. परंतु मला मंत्री मिळणार नाही, हे आजच मी कार्यकर्त्यांना सांगत आहे. त्यांनी अपेक्षा ठेऊ नका. कारण मंत्रीपद देताना म्हणतील, हा रगीट व्यक्ती आहे. त्याच्याऐवजी दुसऱ्यांना पद दिले पाहिजे. यापूर्वी सत्ता आली तेव्हा मला मंत्रीपद मिळायला हवे होते. परंतु मिळाले नाही. त्यानंतर मी कधीही बोललो नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर भाजपचे लोक सातत्याने हल्ला करत होते. त्यावेळी आपल्या पक्षातील मंत्रीपद मिळालेले सर्व जण गप्प बसले होते. तेव्हाही मी एकट्याने भाजपवर हल्ला चढवला होता.

गटानेता म्हणून मी दावेदार होतो पण…

पक्ष फुटला तेव्हा गटनेता म्हणून माझाच दावा होता. पण त्यावेळी मला गटनेते केले नाही. तेव्हा मी काही बोललो नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजपला विरोध करणारा मी एकटा होतो. २० तारखेला मतदान झाले होते. मी २१ तारखेला कोकणात होतो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. मला मुंबईला बोलवलो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. त्या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मी सरळ सांगितले. तुम्ही भाजपसोबत गेले तर मी तुमच्यासोबत नसणार. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले, सर्व गेले तरी चालतील, आपण दोघे राहिले तरी चालेल. भाजपविरोधात आपण दोघे लढत राहू, असे आपणास उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us