Bhiwandi Building Collapsed : रडण्याच्या आवाजाने वाचला जीव… कोहिनूर दुर्घटनेतील आणखी चौघांना वाचवले
भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून, NDRF-TDRF ने अनेक जीव वाचवले. बचावकार्यासाठी शेजारची घरे पाडल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली, त्यांच्या पुनर्वसनाची मागणी जोर धरत आहे. मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तात्पुरत्या निवाऱ्याची आणि मदतीची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शोधकार्य अजूनही सुरू आहे.

भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे . काल रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रात्रभरापासून त्यांच्याकडून संयुक्त बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. या दुर्घटनेत कित्येकांनी जीव गमावला असला तरी अनेकांना जीव वाचवण्यातही आला, त्यात 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याच बचावकार्यादरम्यान एका व्यक्तीचा रडण्याचा आवाज आल्याने सर्वांचे कान टवाकरले गेले, त्यांनी तताडीने आवाजाच्या दिशेने शोधमोहिम सुरू केली आणि त्यानंतर जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळालं. ढिगाऱ्याखालून एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर बचाव पथकांनी तिच्यापर्यंत पोहोचत तिला सुरक्षित बाहेर काढले. त्याचबरोबर आणखी तीन जणांचेही यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात आलं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळमजल्यात काही नागरिक अडकल्याची माहिती मिळाली होती. मात्र मोठ्या प्रमाणातील ढिगाऱ्यामुळे त्या भागापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने बचावकार्य सुरू होतं. अखेर चार जणांना वाचवण्यात यश मिळालं आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी काही नागरिक अडकल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शोध आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याचे TDRF कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारतीलगतची इमारतही धोकादायक अवस्थेत असून ती कधीही कोसळू शकते. त्यामुळे बचाव पथकं मर्यादित मनुष्यबळासह अत्यंत काळजीपूर्वक काम करत आहेत.
शेजारची घरं पाडल्याने अनेक कुटुंबे बेघर
कोहिनूर इमारत पडल्यानंतर बचावकार्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी याच इमारतीलगत असलेल्या चाळीतील सुमारे 10 ते 12 घरे जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. या कारवाईमुळे अनेक कुटुंबं काल रात्रीपासून बेघर झाली असून त्यांच्यासमोर निवारा, अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची, जेवणाची किंवा अन्य मूलभूत सुविधांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. दुर्घटनास्थळी पाहणीसाठी आलेले मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. “बचावकार्यासाठी आमची घरं पाडली, मात्र आमच्या पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था केली नाही,” अशी व्यथा रहिवाशांनी महाजन यांच्यासमोर साश्रूनयनांनी मांडली.
अखेर रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक प्रशासनाला बेघर झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत, तात्पुरता निवारा आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
