उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा पक्षाला रामराम, असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

Uddhav Thackeray : निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी आमदाराने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा पक्षाला रामराम, असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश
Uddhav thackeray ubt
Image Credit source: Google
| Updated on: Jan 26, 2026 | 3:40 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. आधी नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर अलिकडेच राज्यातील 29 महानगर पालिकाही पार पडल्या आहेत. या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले होते. त्यानंतर आता 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. याच निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे औसाचे माजी आमदार दिनकरराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिनकरराव माने यांचा भाजपमध्ये प्रवेश

लातूर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार दिनकरराव माने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितित भाजपामध्ये प्रवेश केला. यात उपजिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख संजय उजळबे, तालुका समन्वयक प्रदीप रणखांब, उप तालुका समन्वयक महादेव साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

भाजपाची ताकद वाढली

दिनकरराव माने यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार, भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील-कव्हेकर, भाजपाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, भाजपाचे मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे लातूरमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

शिवसेना का सोडली?

भाजपप्रवेशाबाबत बोलताना दिनकरराव माने यांनी म्हटले की, ‘विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यात शिवसेना सक्षमपणे उभी करण्याचे आणि जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केलं. आम्हाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं, मला दोन वेळेस आमदार केलं. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने लातूर जिल्ह्यावर लक्ष दिले नाही. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर शिवसेना कमजोर होत गेली. शिवसैनकांची कामे वेळेवर होत नाहीत. सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसठी काम करावं या अपेक्षेने भाजपात पक्षप्रवेश करत आहे.’