देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला
"विरोधकांना पुढील अडीच ते तीन वर्षे काही काम नाही. त्यामुळे त्यांना तेवढी वर्ष काहीतरी सारखं चालू ठेवायला लगाणार" असा टोला दुष्काळावरून टीका करणाऱ्या विरोधकांना मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

शंकर देवकुळे, प्रतिनिधी : नुकतचं शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपायोजना करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्या पत्रावरुन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. “पत्र देऊन जागे होणारे,असंवेदनशील मुख्यमंत्री नाहीत. संवेदनशील मुख्यमंत्री आहेत” असा खोचक टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. “कर्नाटक सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबत जे केलं ते विरोधकांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावे” असं खोचक आवाहन मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
विरोधकांकडून कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, महाराष्ट्र सरकार का करत नाही,असा सवाल करण्यात आला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी “कर्नाटक राज्य देखील नियमांवर चालणारे राज्य आहे. कर्नाटक मध्ये जे काही चाललंय ते लक्षात आणून द्यावं,नियमाप्रमाणे त्यांनी आधी काय केलं,याचा अभ्यास करू” असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.
दुर्बीण घेऊन शोधण्याचे काम चालू आहे
“निवडणूक लांब असल्याने विरोधकांचे रोज दुर्बीण घेऊन शोधण्याचे काम चालू आहे, आज काय बोलता येईल, रोज सकाळी एकत्र येऊन ठरवतात,आज काय बोलता येईल” असा खोचक टोला शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी काजू-बदाम टिकेवरून विरोधकांना लगावला आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या दुष्काळी दौऱ्यादरम्यान खालेल्या काजू-बदाम वरून टिका सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये नव्हे तर एरव्ही देखील काजू-बदाम खाणं योग्य नाही,असे देखील स्पष्ट केलंय,ते सांगली मध्ये बोलत होते.
त्यामुळे त्यांनी पाठ थोपटून घ्यावी
“प्रत्येकाने आपली पाठ थोपटून घ्यायची असते. त्यामुळे त्यांनी पाठ थोपटून घ्यावी” असा टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना लगावला आहे. हे सरकार आपलं काम कर्तव्यदक्षपणाने करतय,असं स्पष्ट केलं आहे.
हा दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त नाही
“पाच ऑक्टोंबर हा दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त नाही. पण त्याआधी काही गोष्टी करायच्या आहेत. त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे निकषानंतर ते निश्चित करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं आहे, ते नियमाप्रमाणे दिले जाईल” असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.