‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात

| Updated on: Oct 22, 2021 | 5:20 PM

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच फटकारले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात सरकारवर टीका केलीय.

थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या राधाकृष्ण विखे यांचा घणाघात
NAWAB MALIK RADHAKRISHNA VIKHE PATIL
Follow us on

अहमदनगर : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वर्षभरात तुम्हाला नोकरी सोडावी लागेल असे आव्हानदेखील त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच फटकारलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात सरकारवर टीका केलीय.

चाड शिल्लक असेल तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा

देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल लोणी येथे विखे पाटील यांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं. “मुख्यमंत्री आणि सरकारमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा. कॅबिनेटमंत्री सरकारी अधिकाऱ्याला धमक्या देतात हे कधी ऐकलं नाही. न्याय देण्यासाठी न्यायालय, उच्च न्यायालय न्याय असताना आजकाल मंत्री धमक्या देत आहेत,” अशी घणाघाती टीका विखे पाटील यांनी केली.

भ्रष्टाचार उघड करणाऱ्या संस्थांना बदनाम करायचं

तसेच पुढे बोलताना बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा नायनाट करावा. एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि तो उघड करणाऱ्या संस्थांना बदनाम करायचं. हा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

साखर कारखान्यांबाबतही राज्य सरकारकडून दुजभाव

तसेच त्यांनी साखर कारखान्यांनी दिल्या जाणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला लक्ष्य केलं. “नाचता येईना अंगण वाकडे अशी राज्य सरकारची अवस्था झाली आहे. काही झालं की केंद्राकडे बोट करायचं. लसीकरण जास्त झालं तर स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. साखर कारखान्यांबाबतही राज्य सरकार दुजभाव करत आहे. विरोधकांच्या कारखान्यांना थकहमी नाकारली जातेय. केंद्र आपली जबाबदारी पार पाडेल, मात्र राज्याची भूमिका त्यांनी जाहीर केली पाहिजे,” असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या :

‘…अन्यथा महागात पडेल,’ नवाब मलिक यांना फोनवरून धमकी, तत्काळ सुरक्षा वाढवली

पुंछमध्ये गोळीबार सुरुच, 13 वर्षानंतर सर्वाधिक काळ सर्च ऑपरेशन, अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी सैन्यदलाचं प्लॅनिंग

अजित पवारांनी कारखाने विक्रीची लिस्टच दिली; सोमय्या म्हणतात, दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला

(bjp leader demands resignation of minister nawab malik who made allegations on sameer wankhede)