
मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदूत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. तर दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सूलतान यांची तुलना छत्रपती शिवरायांसोबत केल्यामुळे आता भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील ट्विट करत सपकाळ यांच्यावर आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले चव्हाण?
‘काशी की कला जाती, मथुरा भी मस्जिद होती, शिवाजी ना होते, तो सुन्नत सबकी होती… अठरा पगड जातीधर्मांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य उभारलं ते रयतेच्या सुखासाठी आणि देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी. अशावेळी केवळ स्वतःचे संस्थान वाचवण्यासाठी ब्रिटीशांशी लढणारा, मंदिरं फोडणारा आणि हिंदूवर अनन्वित अत्याचार करणारा टिपू सुलतान शिवरायांच्या समकक्ष कसा असू शकतो? असे विचार फक्त काँग्रेसच्याच मोंगलाई मानसिकतेतून येतात. या मोगलाई मानसिकतेचे दर्शन घडवणारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘काँग्रेसनिष्ठा’ जपली, पण महाराष्ट्राशी असलेली निष्ठा मात्र पायदळी तुडवली आहे. सपकाळजी, तुमचा जन्म छत्रपतींच्या महाराष्ट्रात झालाय याचा विसर पडू देऊ नका! या मोगलाई मानसिकतेमुळेच महाराष्ट्राने काँग्रेसला वेळोवेळी नाकारले आहे… महाराष्ट्राच्या हिंदवी अस्मितेला धक्का लावू नका! नाहीतर… ज्या मातीने औरंगजेबाची कबर खोदली, तीच माती काँग्रेसच्या या ‘मोगलाई’ मानसिकतेचा पार चक्काचूर केल्याशिवाय राहणार नाही!’ असं ट्विट रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे.
काशी की कला जाती, मथुराभी मस्जिद होती,
शिवाजी ना होते, तो सुन्नत सबकी होती…अठरा पगड जातीधर्मांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य उभारलं ते रयतेच्या सुखासाठी आणि देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी.
अशावेळी केवळ स्वतःचे संस्थान वाचवण्यासाठी ब्रिटीशांशी लढणारा, मंदिरं फोडणारा आणि…
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) February 14, 2026
दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, टिपू सुलतान सारख्या व्यक्तीची तुलना ते छत्रपती शिवरायांसोबत करत आहेत, हे अत्यंत निंदनीय काम आहे.’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.