नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

| Updated on: Jun 08, 2021 | 12:19 PM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या 18 गावांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्या गावातील ग्रामस्थांनी विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून जन आंदोलन छेडले आहे

नवी मुंबई विमानतळासाठी महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम; तर 18 गावांचा दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Navi Mumbai Airport Name
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Navi Mumbai International Airport) ज्या शेतकऱ्यांच्या भूमीचे संपादन झाले आहे त्यांच्या माध्यमातून जन आंदोलन करण्यात आले आहे. स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी केलेल्या जन आंदोलनामुळे साडे 12 टक्के भूखंड वाटप ही संकल्पना उदयाला आली होती. त्याचाच भाग असणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या 18 गावांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्या गावातील ग्रामस्थांनी विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून जन आंदोलन छेडले आहे (Navi Mumbai BJP Vs Mahavikas Aghadi On The Navi Mumbai International Airport Name Issue).

18 गाव समितीचे ग्रामस्थ वेळ पडल्यास विमानतळाचे काम बंद पाडू असा थेट इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. महाविकास आघाडीचे स्थानिक नेते ते आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलवत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. महाविकास आघाडीचे नेते कायद्याची गोष्ट करतात. मात्र साडेबारा टक्के कायदा जन्माला घालणारे दि. बा. पाटील आहेत. ते आगरी समाजाचे असताना सर्वांनी त्यांच्या नावासाठी ठामपणे भूमिका घेणे गरजेचे असताना हे पुढारी दावणीला बांधलेले असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

महाविकासआघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम

नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांची दिशाभूल करण्याकरता तिथे गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते राजकारण करुन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना भडकविण्याचा घाट घातला आहे. मात्र, पनवेल उरण महाविकास आघाडीचे नेते विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीच्या समितीचे बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, आर. सी. घरत, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, प्रशांत पाटील, शिरीष घरत, काशिनाथ पाटील, सुदम पाटील, रामदास शेवाळे, रामदास पाटील, गणेश कडू, राजेश केणी, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, प्रदीप ठाकूर, दीपक घरत आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

“विमानतळ नामकरणासाठी इतका अट्टाहास होता, तर प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना तसा ठराव का केला नाही? किंवा मग सहा महिन्यापूर्वी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली त्यावेळी हे स्वार्थी नेते कुठे गेले होते? जर यांना दि. बा. पाटील यांच्या नावासाठी झटायचे होते मग 6 महिने कोणाची वाट बघत होते? आज राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करीत आहे आणि भाजपचे राज्यातील नेते सरकार पाडण्यासाठी नको त्या थराला जात आहेत. अशीच परिस्थिती आता पनवेल उरणमधील स्थानिक भाजप नेते करत आहेत. मात्र असे करताना स्थानिक भूमिपुत्रांच्या वेळेचा गैरवापर करून त्यांना भडकविण्याचे गलिच्छ राजकारण रामशेठ ठाकूर करत आहेत”, अशी टीका बबनदादा पाटील यांनी केला.

“विमानतळाला नाव कोणाचे द्यायचे? याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन नंतर आपण भूमिका मांडणार होतो. मात्र त्यापूर्वीच राजकारण करण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तयारी दर्शवली. त्यानंतरही जासई येथे झालेल्या बैठकीमध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र स्वार्थी राजकारणासाठी रामशेठ ठाकूरांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.”

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

“महाराष्ट्रात विमानतळाच्या नामकरणासाठी विधानसभेच्या ठरावाची आवश्यकता असते. मात्र त्यावेळी भाजपचे दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आपल्या 105 आमदारांना विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी विरोध करतील का आणि याबाबत ते जाहीर करणार का? या प्रश्नाचे उत्तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यावे आणि मगच प्रकल्पग्रस्तांना रामशेठ ठाकूर यांचे स्वार्थी राजकारण लक्षात येईल. तसेच भाजपचे राष्ट्रीय नेते दि. बा. पाटील यांच्या नावाला समर्थन करणार की मग बाळासाहेब ठाकरे यांना? याचे उत्तरही त्यांनी द्यावे.”

“राज्यात कोरोनाची तिसरी लाट येत आहे, या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण कुटुंबातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी केल्यानंतर त्यांच्या घरात कोरणामुळे काही आघात झाल्यास रामशेठ ठाकूर यांच्यासह दोन आमदार जबाबदारी घेणार का?” असा सवालही यावेळी बबनदादा पाटील यांनी उपस्थित केला.

आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना बबनदादा पाटील पुढे म्हणाले की, “पनवेल उरणमध्ये भाजपच्या दोन आमदारांसह राज्यातील भाजप नेते पनवेलमध्ये येतात, विमानतळ नामकरणाची निवेदने घेतात, मग या विषयावर आपली मते का मांडत नाहीत, यावरून हा भाजप पक्षाने उचललेला मुद्दा नसून रामशेठ ठाकूर यांनी स्वार्थी राजकारण करण्यासाठी केलेले षड्यंत्र आहे आणि हेच आम्ही याद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या, भूमिपुत्रांच्या निदर्शनास आणून देत आहोत. यावेळी शेवटी बोलताना बबनदादा पाटील यांनी सांगितले की, पनवेल उरण महाविकास आघाडीची स्वर्गीय दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती आहे तसेच ती कायम राहणार आहे.”

दि.बा.पाटील यांची अपूर्ण कामे आमच्या मार्फत सुरूच राहतील. स्थानिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या गरजेपोटी घरांना कायम करण्यासाठी आमचा लढा सुरूच आहे, पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आधीच त्रासलेल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना भडकावुन त्यांचे संसार कशाला उघड्यावर आणताय ? हे आम्ही खपवून घेणार नाही. दि.बा.पाटील हे आमचे आधार स्थान आहेत, त्यांच्या नावासाठी मोठे प्रकल्प आपल्यासमोर आहेत. मात्र विमानतळ नामकरणासाठी रामशेठ ठाकूर यांनी केलेलं गलिच्छ राजकारण पाहता पनवेल-उरण महाविकास आघाडी स्व. बाळासाहेब ठाकरे अंतरराष्ट्रीय विमानतळ या नावावर ठाम राहिली आहे आणि राहणार असल्याचा सूरही यावेळी लगावण्यात आला.

Navi Mumbai BJP Vs Mahavikas Aghadi On The Navi Mumbai International Airport Name Issue

संबंधित बातम्या :

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चिघळणार, मुंबई-पणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेची बॅनरबाजीय

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याबाबत सेनेत एकमत, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर