“काय उखाडायचे ते उखाडून घ्या…”; शिवसेनेच्या आमदाराने विरोधकांना खडसावून सांगितले…

| Updated on: Apr 19, 2023 | 7:01 PM

शहरात आणखी शंभर पाचशे टपऱ्या उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे कुणाला काय उखाडायचे ते उखाडून घ्या, असं म्हणत संजय गायकवाड यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.

काय उखाडायचे ते उखाडून घ्या...; शिवसेनेच्या आमदाराने विरोधकांना खडसावून सांगितले...
Follow us on

बुलढाणा : बुलढाणा शहरातील विकासावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप टोकाला गेले आहेत. एकीकडे राज्यात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राजकारण ढवळून निघाले असतानाच आता बुलढाणा शहरातील शिवसेना आणि काँग्रेस हा वादही आता टोकाला पोहचला आहे. शहरातील विकासाच्या मुद्यावरून आता आमदार धीरज लिंगाडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यावरून आता आमदार संजय गायकवाड यांनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका टिपण्णी केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, शहरातील ज्या टपऱ्यांच्या अतिक्रमाणाविषयी टीका केली जात आहे.

त्या टपऱ्या सगळ्या गोरगरीबांच्या आहेत आणि त्या जर गोरगरीबांच्या टपऱ्या असतील तर आम्ही आणखी 100-500 टपऱ्यांचे अतिक्रमण करणार असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, बुलढाणा नगरपालिकेत आमदार धीरज लिंगाडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली होती. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ देखील या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीवेळी त्यांनी गावातील अतिक्रमणधारकांचा मुद्दाही उचलून धरला होता. त्यावरूनच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात माजी आमदार सपकाळ यांनी एक टक्काही काम केलं नाही.

त्यामुळे त्यांना या अतिक्रमणाविषयी बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. शहरातील ज्या काही टपऱ्या आहेत, त्या गरीबांच्या टपऱ्या आहेत.त्यामध्ये काय आमचे नातेवाईक राहत नाहीत.

त्यामुळे शहरात आणखी शंभर पाचशे टपऱ्या उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे कुणाला काय उखाडायचे ते उखाडून घ्या, असं म्हणत संजय गायकवाड यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.