विजय वडेट्टीवार यांनी स्वत:बद्दल व्यक्त केली मोठी भीती, नेमकं काय म्हणाले

| Updated on: Aug 19, 2023 | 11:53 PM

विजय वडेट्टीवार यांनी भर कार्यक्रमात आपल्याबद्दल एक भीती व्यक्त केली आहे. या भीतीच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. पण आपण कुणालाही घाबरत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी स्वत:बद्दल व्यक्त केली मोठी भीती,  नेमकं काय म्हणाले
Follow us on

चंद्रपूर | 19 ऑगस्ट 2023 : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वत:बद्दल मोठी भीती व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर प्रहार करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना आता आपल्यावर कारवाईची ब्याद मागे लागेल अशी भीती वाटत आहे. त्यांनी चंद्रपूरमध्ये जाहीर कार्यक्रमात याबाबतचं वक्तव्य केलं. पण भाजपवाल्यांचीही पापं आपल्याला माहीत असल्याचा दावा त्यांनी केला. आमची सत्ता आल्यास भाजपच्या लोकांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं. आपल्याला यासाठीच हायकमांडने मोठी जबाबदारी दिल्याची भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर आज पहिल्यांदाच चंद्रपूर शहारात दाखल झाले. यावेळी त्यांचं चंद्रपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. काँग्रेसकडून त्यांचा शहरातील गांधी चौकात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाषण करताना विजय वडेट्टीवार यांनी आपल्याविरोधातही केंद्रीय यंत्रणांची कारवाई होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. पण आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

“सरकार विरोधात बोलतोय. त्यामुळे मला सुखाने झोप लागू देतील का?”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पण “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. सत्ता बदलू द्या. मग आम्ही सांगतो. विरोधात बोललं की ईडी आणि सीबीआयची कारवाई केली जाते. उद्या तुमच्यावरही कारवाई होईल. आम्हालाही तुमची काय पापं आहेत ते माहिती आहे. आमच्याकडेही तुमच्या पापांची यादी आहे. आम्ही आज जेलमध्ये जाऊ, पण तुमचाही दिवस येईल”, असं विजय वडेट्टीवार आक्रमकपणे भाजप आपल्या भाषणात म्हणाले.

सप्टेंबर महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री बदलणार?

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी पुढच्या महिन्यात राज्याचा मुख्यमंत्री बदलेल, असा दावा केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. सत्ताधारी नेत्यांनी वडेट्टीवार यांच्या दाव्यावर टीका केलीय. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पण वडेट्टीवार आपल्या दाव्यावर ठाम आहेत.

“राज्यात मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही”, असं वडेट्टीवार म्हणाले. “ज्यांना मुख्यमंत्री केलं त्यांना काम करु देत नाहीत. जे मुख्यमंत्री होणार होते ते अर्धे मुख्यमंत्री झाले. अर्ध्यातून त्यांचा पुन्हा अर्धा हिस्सा काढून घेतला. 105 लोकं निवडून येवून हे लोकं हिस्सा घेत असतील तर हे लोकं स्वस्थ बसतील? मुख्यमंत्री बदलीचे वारे जोरदार सुरु आहेत”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.