चारकोपमध्ये सिलिंडर न मिळाल्याने राडा, तर कुठे थेट पेट्रोलची चोरी, इंधन तुटवड्यामुळे नेमकं काय घडतंय?

अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळेनासे झाले आहे. त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण झाले आहे. दुसरीकडे पेट्रोल चोरीच्या घटनांतही वाढ झाली आहे.

चारकोपमध्ये सिलिंडर न मिळाल्याने राडा, तर कुठे थेट पेट्रोलची चोरी, इंधन तुटवड्यामुळे नेमकं काय घडतंय?
charkop gas agency
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 5:32 PM

राण आणि इस्रायल यांच्यात युद्ध पेटल्याने भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर मिळत नाहीये. तसेच काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलही मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपलेले आहे. चारकोप, उल्हासनगर या भागात तर काही ठिकाणी लोकांनी गर्दी केल्याचे दिसले. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने संतप्त लोकांनी चारकोपमधील गॅस एजन्सीची तोडफोड केली आहे. तर उल्हासनगरमध्ये पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उल्हासनगरात पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय.

चारकोपमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार आज (30 मार्च) दुपारी चारकोप गावात गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. गॅस सिलिंडर न मिळाल्याने लोक संतप्त झाले आणि त्यांनी आधी गॅस सिलिंडरच्या गोदामाजवळ गोंधळ घातला. त्यानंतर संतप्त लोकांनी एचपी गॅस एजन्सीमध्ये येऊन प्रिंटर आणि टेम्पोची काच फोडली. या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. चारकोपचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितले की, गॅस सिलिंडरसाठी लोक जमले होते, परंतु आज गॅसची गाडी न आल्याने संतप्त झालेल्या लोकांनी प्रिंटरची तोडफोड केली. इतर कोणतीही तोडफोड झालेली नाही. गॅस एजन्सीजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

…म्हणून माझ्या हाताला दुखापत झाली

एचपी गॅस एजन्सीच्या एका महिला कर्मचाऱ्याने या घटनेची सविस्तर माहिती दिली. तिथे लोकांची मोठी गर्दी होती, ते कार्यालयात आले आणि गोंधळ घालत होते. त्यामुळेच माझ्या हाताला किरकोळ दुखापत झाली, असे या महिला कर्मचाऱ्याने सांगितले.

पेट्रोल चोरीच्या घटनांत झाली वाढ

पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे उल्हासनगर शहरात पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. दुचाकींमधून इंधन लंपास करण्याच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिराघाट परिसरात उभ्या असलेल्या दुचाकींमधून अज्ञात चोरट्यांकडून पेट्रोल काढून नेले जात आहे. काही वाहनधारकांना सकाळी गाडी सुरू करताना पेट्रोल संपल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्यामध्ये काही संशयित व्यक्ती दुचाकीच्या टाक्यांमधून इंधन काढताना दिसत आहेत. पोलिसांकडून या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांनी अनावश्यक घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत, अशी सूचना पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us