महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेणार, देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं वक्तव्य 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी डीडी वाहिनीला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंसोबत युती करणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं.

महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेणार, देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं वक्तव्य 
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे
| Updated on: Dec 06, 2024 | 6:41 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत आमचे तीन पक्ष असल्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षाला जास्त जागा देणं शक्य झालं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. पण राज ठाकरे यांनी लोकसभेत खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरे यांना सोबत घेऊ, त्यांच्यासोबत युती करु, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांच्या भेटी घेतल्या आहेत. असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भाजपसोबत युती झाली नाही.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत भाजपने राज ठाकरे यांच्या पक्षाचा विचार केला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढली. पण ठाकरेंच्या पक्षाला एकही जागेवर यश मिळालं नाही. विधानसभा निवडणुकीनंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या. यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत त्यांना राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले?

“मुळात लोकसभेत राज ठाकरे यांनी खुल्या दिलाने पाठिंबा दिला. आम्हाला फायदा झाला. त्यांचा पक्ष आहे. त्यांनी निवडणुका लढल्या नाही तर पक्ष चालणार कसा. आमच्याकडे जागाच नव्हत्या. तीन पक्ष होतो. त्यामुळे ते स्वतंत्र लढले. त्यांना मते चांगले मिळाले. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे त्यांच्याशी युती करू”, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. “महापालिकेच्या निवडणुका न होणं चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयात अडकलं आहे. मी कालच वकिलांशी बोललो. अर्ली हिअरिंगची याचिका करा आणि स्टे हटवा”, अशी देखील प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.